हुकूमशाहीवर माझा अजिबात विश्वास नाही : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे जेतेपदानंतर प्रतिपादन, आयपीएल इतिहासात मुंबई सर्वात यशस्वी संघ
वृत्तसंस्था / दुबई
माझ्या नेतृत्वाची शैली खेळाडूंवर कोणतेही बंधन लादत नाही. विशेषतः हुकूमशाहीवर माझा अजिबात विश्वास नाही. मी खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य देतो आणि ते देखील यामुळे आपला नैसर्गिक खेळ साकारण्यात सफल होतात. मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत जे यश प्राप्त केले, त्याचे रहस्य हेच आहे, अशा शब्दात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाच्या वाटचालीचे वर्णन केले.
विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 5 गडी राखून मात दिली आणि झळाळत्या आयपीएल चषकावर कब्जा केला. त्यानंतर पुरस्कार सोहळय़ाला संबोधित करताना रोहित बोलत होता.
समतोल साधणे महत्त्वाचे
‘मी प्रत्येक खेळाडूमागे लाठी-काठी घेऊन मागे धावणारा कर्णधार नव्हे. खेळाडूंना आत्मविश्वास देऊनच त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करवून घेता येते. त्यामुळे समतोल साधणे अधिक महत्त्वाचे ठरते’, असे तो म्हणाला. सहायक पथकातील सर्व घटकांचे देखील त्याने यावेळी आभार मानले.
‘स्पर्धेतील अगदी पहिल्या चेंडूपासून आमच्या खेळाडूंनी अनुभव, ताकद पणाला लावून खेळण्यावर भर दिला. सहायक पथकातील सदस्यांना तर या यशाचे आणखी श्रेय जाते. कारण, ते नेहमी पडद्याआड असतात. पण, आपली जबाबदारी चोख पार पाडत असतात. आयपीएल स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच प्रँचायझीतील विविध घटक कार्यरत झाले होते. त्यामुळे, खेळाडूंप्रमाणेच सर्व घटक या यशाचे मानकरी आहेत’, असे रोहितने एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.
कर्णधार रोहितने स्वतः पुढाकार घेऊन लढताना 51 चेंडूत 68 धावांची भरीव खेळी साकारली आणि यामुळे मुंबई इंडियन्सने 18.4 षटकात 157 धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यापूर्वी, ट्रेंट बोल्टने 30 धावातच 3 फलंदाजांना गारद केल्यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 7 बाद 156 धावांवर रोखून धरले होते.
सुर्यकुमारच्या धावचीतबद्दल खेद
रोहित शर्माने यावेळी बहरातील सुर्यकुमार यादवचे धावचीत होणे दुदैवी होते, असे येथे नमूद केले. ‘सुर्यकुमारचा फॉर्म पाहता, मी माझी विकेट बहाल करणे योग्य ठरले असते. त्याने पूर्ण हंगामात सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारताना अतिशय उत्तम फटकेबाजी केली आहे’, असे तो म्हणाला.
सुर्यकुमार यादवने येथे रोहितसाठी आपली विकेट बहाल देणे पसंत केले होते. त्या पार्श्वभूमीवर रोहित बोलत होता. यंदाची आयपीएल स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये, प्रेक्षकांविना खेळवली गेली. त्याचा उल्लेख करताना रोहितने आपल्याला चाहत्यांच्या गैरहजेरीची प्रकर्षाने उणीव जाणवली असल्याचे सांगितले. ‘दुर्दैवाने चाहते स्टेडियमवर येऊ शकत नव्हते. आम्ही अगदी वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासही मुकलो. पुढील वर्षी तेथे आम्ही खेळू शकू’, असा आशावाद त्याने व्यक्त केला.
आयपीएल स्पर्धेतील विविध पुरस्कार जेते
- ऑरेंज कॅप केएल राहुल (किंग्स इलेव्हन पंजाब)
- पर्पल कॅप कॅगिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स)
- फायनलमधील सामनावीर ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)
- हंगामातील उदयोन्मुख खेळाडू देवदत्त पडिक्कल (आरसीबी)
- शिस्तबद्ध संघ मुंबई इंडियन्स
- हंगामातील गेमचेंजर केएल राहुल (पंजाब)
- सुपर स्ट्रायकर पुरस्कार केरॉन पोलार्ड (मुंबई)
- क्रॅक ईट सिक्सेस इशान किशन (मुंबई इंडियन्स)
- हंगामातील पॉवर प्ले खेळाडू ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)
- सर्वात मौल्यवान खेळाडू जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)
पुढील आयपीएल स्पर्धा 6 महिन्यांच्या आतच!
एरवी आयपीएल स्पर्धा एप्रिल ते जून या कालावधीतच भरवली जाते. पण, यंदा कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे ही स्पर्धा सहा महिने उशिराने खेळवली गेली. अर्थात, यापुढील कालावधीत परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुढील स्पर्धा 2021 एप्रिल ते जूनदरम्यान आयोजित केली जाऊ शकते. प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या लिलावाचे डिसेंबरमध्ये आयोजन केले जाते. त्याची रुपरेषाही लवकरच जाहीर केली जाईल, असे बीसीसीआयने यापूर्वी म्हटले आहे.
आयपीएल स्पर्धेत येणार नवा संघ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आयपीएल हंगामात नवा प्रँचायझी समाविष्ट होईल आणि यामुळे 8 ऐवजी 9 संघात ही स्पर्धा रंगू शकते. नववी प्रँचायझी ही अहमदाबादमधून असू शकते आणि सरदार पटेल स्टेडियम (मोटेरा) हे त्यांचे होम ग्राऊंड असेल. एरवी, प्रँचायझींना राईट टू मॅच (आरटीएम) कार्डद्वारे आपल्या संघातील 3 खेळाडूंना कायम राखू शकते. पण, याबाबत अद्याप काहीही चित्र स्पष्ट नाही.