वार्ताहर / खोची
पावसाची दोन दिवसाची उघडीप आणि धरणातील विसर्ग कमी असून खोची परिसरात वारणेच्या महापुराचे पाणी धोक्याच्या पातळीवर आले आहे. नदीकाठच्या भागातील घरात पाणी शिरले आहे. तर खोची येथील भैरवनाथ मंदिर परिसराला महापुराचा वेढा पडल्यामुळे संपर्क तुटला आहे. तसेच भेंडवडे, लाटवडे रस्त्यावर सखल भागात पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. त्यामुळे खोची परिसराचा लाटवडे, दुधगाव संपर्क बंद झाले आहेत.
खोची परिसरात दोन दिवसात पावसाचे चांगली उघडीप मिळाली आहे. परंतु कृष्णा नदीच्या महापुरामुळे वारणा नदीला मोठा फुगवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे महापुराचे पाणी शेतात आल्यामुळे नदीकाठची शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. दरम्यान वडगावचे मंडलाधिकारी गणेश बरगे यांनी महापुराची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन सूचना दिल्या. तसेच पुररेषेत येणाऱ्या सर्व रहिवाशांना स्थलांतर करण्याची विनंती केली आहे. मागील वर्षी आलेल्या महापुरात खोची येथील साडेचारशे, भेंडवडे येथील अडीचशे आणि बुवाचे वठार येथील दीडशे कुटुंबे बाधित झाली होती. या सर्वांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांची व्यवस्था प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.