अज्ञाताकडून कृत्य
प्रतिनिधी / म्हापसा
खोर्ली म्हापसा येथे असलेल्या शांतीवन स्मशानभूमीचे कुलूप तोडून काल रात्री अज्ञात इसमांनी आतमधील सुमारे 4 लाख रुपयांची जळावू लाकडांना आग लावली तसेच आतमध्ये असलेल्या नळाच्या पाईपलाईनची मोडतोड केली असल्याची लेखी तक्रार शांतीवन स्मशानभूमीचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे. याबाबत तेथे राहणारे महेश शिरगावकर, सुनील साळकर यांनी घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलास दिल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली.
आग लावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र आग लावणारा माथेफिरू असावा असा कयास होत आहे. या स्मशानभूमीत कुणालाही लाकडे कमी पडू नये म्हणून मोठय़ा प्रमाणात जळावू लाकडे आणून साठवून ठेवण्यात आली होती. गोदामामध्ये ठेवण्यात आलेल्या लाकडांना आग लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आतमध्ये असलेल्या सीडीलाही आग लावण्यात आली आहे. शिवाय आतमधील पाण्याची पाईपलाईन पूर्णपणे उखडून तिची मोडतोड केल्याचे आढळून आले आहे.
घटनेची माहिती कळाल्यावर खोर्ली म्हापसा येथील रहिवाशांनी खोर्ली शांतीवन स्मशानभूमीकडे धाव घेतली. तोपर्यंत तेथे म्हापसा अग्निशमन दलाचे बंब पोचले होते. दलाचे जवान उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, हवालदार विष्णू गावस, ड्रायव्हर देवेंद्र नाईक, वासुदेव ताटे, जितेंद्र नाईक, दत्तराज च्यारी, परेश मांद्रेकर तसेच पीळर्णकर यांनी आग विझविण्यास सहकार्य केले. आगीचा रूद्रावतार पाहून पीळर्णहून अन्य एक बंब मागविण्यात आला. दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या नेतृत्वाखाली ही आग विझविण्यात आली.