लष्करप्रमुखांचा पाकिस्तान-चीनला इशारा : जवान कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार
लेह, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावादरम्यान लडाखच्या दोन दिवसीय दौऱयावर गेलेले लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांना कडक शब्दात सुनावले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे एलएसीवर स्थिती गंभीर आणि नाजूक आहे. मात्र, भारत सदैव सज्ज असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एलएसीवर स्थिती थोडी तणावपूर्ण आहे. स्थिती लक्षात घेता, आपण आपल्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतली आहे, जेणेकरून आपली सुरक्षा आणि अखंडता सुरक्षित राहावी. आपण कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत, असे ते म्हणाले. लडाखमधील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला आहे.
चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी नाजूक व गंभीर असून चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षा वाढविण्यासाठी काही खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, असे भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी सांगितले. जवानांचे मनोबल उंचावलेले आहे आणि ते कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारत व चीनदरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाख विभागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱयावर नरवणे लेह येथे पोहोचले होते. भारत आणि चीनच्या लष्करांनी आपआपल्या सीमावर्ती भागांमध्ये जवळपास 1 लाख सैनिक आणि शस्त्रे तैनात केली आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून परिस्थिती नाजूक आहे. गुंता सोडविण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. चर्चेतून सीमाप्रश्नाचे पूर्णपणे निराकरण होण्यास मदत होईल असा विश्वास आपल्याला आहे, असे नरवणे यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती थोडी नाजूक आणि गंभीर असली, तरी आम्ही त्याबद्दल विचार करत आहोत. सुरक्षेसाठी आम्ही काही खबरदारीची पावले उचलली आहेत आणि आम्हाला खात्री आहे की परिस्थिती बदलणार नाही. आम्ही अशी पावले उचलली आहेत की, जी आम्हाला मदतकारी ठरतील, असे ते म्हणाले.
तोडगा निघण्याची आम्हाला आशा
लेह-लडाखमध्ये मागील 2-3 महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे, परंतु आम्ही चीनसोबत सैन्य आणि राजकीय दोन्ही स्तरावर चर्चा करत आहोत. शांततेच्या मार्गाने सुरू ठेवलेले प्रयत्न यापुढेही कायम राहतील. चर्चेतून आपसातील मतभेदावर तोडगा निघेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तरीही हिताचे रक्षण करण्यासाठी सक्षम असू असेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्करप्रमुख म्हणाले, जवानांचे मनोधैर्य मोठे आहे आणि ते कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहेत. मी पुन्हा सांगतो की, आमचे अधिकारी आणि जवान जगात सर्वात चांगले आहेत. आमच्या जवानांचा केवळ लष्करालाच नव्हे, तर देशाला अभिमान आहे, असे नरवणे म्हणाले.