गगनबावडा-करुळ घाटातील नागमोडी वळणे पर्यटकांना घालतात भुरळ
प्रतिनिधी / गगनबावडा
नैसर्गिक नवलाईचा अविष्कार, भक्तीपीठ, तलावांचा ठेवा, ऐतिहासिक वारसा, लाभलेल्या गगनबावडा तालुक्यात शहरवासीयांचा ओढा वाढला आहे. दत्तजयंती सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने मर्द किल्ले गगनगडावर जय्यत तयारी सुरू आहे.हिवाळा सुरु होताच आठवडा सुट्टीच्या र्पाश्र्वभूमीवर गगनबावडा तालुक्यात पर्यटकांचा ओढा वाढला आहे. येथील पर्यटन स्थळी हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे.
कोल्हापूरच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर येतो तो गगनबावडा. अतीपाऊस पाहता प्रतिचेरापूंजी, अतीथंडी पाहता प्रतिमहाळळेश्वर, अशा कितीतरी टोपणनावाने गगनबावडा ओळखला जातो. मोरजाई, किलचा ही पांडवकालिन कोरीव लेण्यांची मंदिरे पाहण्यास गर्दी असते. पश्चिम महाराष्ट्रातील ही अतीउंच ठिकाणे होत. झाडे वेलीनी आच्छादलेल्या डोंगररांगा, नानारंगी फुलांनी बहरलेल्या खोल दऱ्या डोळ्यांचे पारणे फेडतात. कोल्हापूर गगनबावडा या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लागणारी गर्द झाडी वेगळाच आनंद देते. निसर्गाने मुक्त हाताने उधळण केली आहे. भूमीवरील स्वर्ग असल्याचा भास होतो. विश्वगौरव पुरस्कार प्राप्त परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला मर्द किल्ले गगनगडावर वर्षभर गर्दी असते. गडाच्या सभोवताली बारमाही भरुन वाहणारे पाण्याचे कुंड तितकेच रहस्यमय आहेत. गडावरील महादेव मंदिर,शेवटच्या टोकावरील मस्जीद येथून सभोवार नजर टाकली असता मनाला वेगळीच उभारी मिळते. करुळ व भूईबावडा या घाटमार्गावरुन ये-जा करणारी वाहने,घाटमार्गातील हिरवाई वेगळीच अनुभूती देते. पाचव्या शतकात राजा मंगलेश यांच्या पत्नीचा चालुक्य कालिन शिलालेख, पळसंबे येथील कोरीव लेणी, साळवण येथील सालवॉ फॉर्ट, असंडोलीचे रासाई मंदिर, भूरळ घालते. लोकसंखेने छोटासा तालुका असला तरी प्राचिन काळापासून कोदे, वेसरफ, कुंभी, अणदूर असे चार जलाशय आहेत उर्वरित धामणी तलाव पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील खजानिस रामचंद्र पंत अमात्य यांची गगनबावडा ही जहॉंगिरी होय. गगनबावडा, पळसंबे इत्यादी ठिकाणी आजही बावडेकर सरकारची मालकी आहे. पळसंबेच्या राजवाड्य़ाचे नुतनीकरण अलीकडेच केले आहे. शहरवासियांचा ओढा इकडे वाढला आहे.
दरम्यान मर्द किल्ले गगनगडावर दरवर्षीप्रमाणे शनिवार 18 रोजी दत्तजयंती सोहळा संपन्न होणार आहे. दत्त जन्म सोहळ्या प्रसंगी सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिह्यातील भाविकांची गर्दी होते. फक्त एक आठवडा कालावधी आहे. या सोहळ्याची सदरच्या जय्यत तयारी सुरू झाली रंगरंगोटी, स्वच्छता, वीज दुरुस्ती, पार्कींग सोय, नळयोजना यांची दुरुस्ती सुरु आहे. कोरोनानियम शिथील केले आहेत. एस. टी. बंद असली तरी शनिवार व रविवार या आठवडा सुट्टीच्या दिवशी शहरवासीयांची गर्दी वाढली आहे. पावसाळा मागे पडल्याने हिवाळी पर्यटनासाठी येणाया पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.