प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमिवर शहरातील गटारींच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. गणपत गल्ली, रामदेव गल्ली अशा विविध परिसरातील गटारींच्या स्वच्छतेचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केले होते. मात्र हे काम एकच दिवस करून दुसऱया दिवशीपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेची गटर स्वच्छता मोहीम म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत.
शहरातील गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी जाण्यास अडचण निर्माण झाली होती. वळीव पावसाचे पाणी गटारींमधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. ठिकठिकाणी कचरा साचल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. पावसामुळे गटारींमधील कचरा रस्त्यावर साचला होता. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गटारी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली होती. गणपत गल्ली तसेच देशपांडे गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक अशा विविध भागात ही मोहीम राबविण्यात आली होती. तसेच दोन दिवसापूर्वी रामदेव गल्ली परिसरातील गटारी स्वच्छ करण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. मात्र सदर काम दुसऱया दिवशीपासून बंद ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी गटारीवर काँक्रिट घातल्याने गटारी स्वच्छ करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. या कारणास्तव स्वच्छता मोहीम थांबविण्यात आली आहे. सदर मोहीम केवळ नागरिकांच्या डोळय़ात धूळफेक असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या महापालिकेच्या मोहिमा कधीच पूर्ण राबविण्यात येत नाहीत. त्यामुळे काही अंतराच्या गटारीची स्वच्छता करून नागरिकांची दिशाभूल चालविली आहे, अशी तक्रार करण्यात येत आहे..