केवळ पाच सैनिक ठार झाल्याचा दावा : भारताकडून साशंकता
वृत्तसंस्था/ बीजिंग
पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात 15 जूनला झालेल्या चीन-भारत जवानांमधील संघर्षात आपल्या लष्कराला झालेल्या दगाफटक्याबाबत अखेर चीनने कबुलीजबाब दिला आहे. गलवानमधील संघर्षात किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनकडून आतापर्यंत देण्यात आली नव्हती. मात्र शुक्रवारी प्रथमच चीनने कबुली देत या संघर्षात एका कमांडिंग अधिकाऱयासह आपले 5 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले. माल्डो येथील चर्चेत चीनने ही गोष्ट मान्य केली. या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते.
चीनने पाच सैनिक मारले गेल्याचा दावा केला असला तरीही अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनचे जवळपास 40 जवान मारले गेले आहेत. मात्र, चीन आतापर्यंत नेमक्या आकडेवारीबाबत मौन बाळगून होता. आता त्यांनी माल्डामध्ये पाच सैनिक ठार झाल्याचे मान्य केले असले तरी या आकडेवारीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
गलवान खोऱयातील संघर्षानंतर भारताने चीनला धक्काबुक्की आणि झडप अशी कारवाई अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर थेट संघर्षात घट झाली असली तरी बऱयाच ठिकाणी सैनिक आमने-सामने आलेले आहेत. दुसरीकडे तणावाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावरही भर दिला जात आहे. चर्चेदरम्यान, चीनने पेंगोंग सरोवराजवळील उंचीवरील भागातील सैन्य भारताने मागे घ्यावे असे चीनने म्हटले. यावर भारताने लडाख भागातील स्थितीचे निराकरण करण्यावर भर दिला आहे.