आयएमईआरसमोर आरपीडी रस्त्यावर प्रकार : काँक्रिटीकरणापूर्वी गळती निवारणाकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील पाणी गळतीचे निवारण करण्यापूर्वीच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्याचा सपाटा स्मार्ट सिटी कंपनीने चालविला आहे. परिणामी आयएमईआरसमोर आरपीडी रस्त्यावर लागलेल्या गळतीवाटे काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यामधूनही पाणी वाहत आहे. यामुळे स्मार्ट सिटी आणि पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्चून विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र, विविध खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट रस्ते बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण रस्ते निर्माण करताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, कोणत्याच विभागाशी समन्वय साधून विकासकामे केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही विभागांकडून स्मार्ट सिटी कंपनीला सहकार्य मिळत नसल्याचेही दिसून आले आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी जलवाहिन्यांच्या गळतीचे निवारण करणे गरजेचे होते. पण याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. आरपीडी क्रॉस ते येळ्ळूर रोड क्रॉसपर्यंतच्या आरपीडी रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले. पण आयएमईआरसमोर असलेल्या गळतीची दुरुस्ती करण्यापूर्वीच रस्त्यावर काँक्रीट घालण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काँक्रीट केलेल्या रस्त्यामधूनही गळतीवाटे पाणी वाहत आहे.
या ठिकाणी यापूर्वीपासूनच जलवाहिनीला गळती लागली होती. रस्त्याच्या रुंदीकरणावेळी गळतीचे निवारण करण्यात आले होते. पण गळती निवारणाचे काम व्यवस्थित झाले नसल्याने पाणी वाहत होते. सदर ठिकाणी लागलेल्या गळतीद्वारे गेल्या 5 वर्षांपासून पाणी वाया जात आहे. गळतीचे निवारण करण्यास पाणीपुरवठा मंडळ अपयशी ठरले आहे. लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रामधून हिंदवाडीमधील घुमटमाळ येथील जलकुंभामध्ये पाणी येते. त्या ठिकाणाहून सर्वत्र पाणीपुरवठा केला जातो. येथील मुख्य वाहिनीलाच ही गळती लागली असल्याने 24 तास पाणी वाया जाते. सदर ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाला होती. तरीदेखील पाणीपुरवठा मंडळाने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच गळतीद्वारे पाणी वाया जात होते. पण रस्त्याच्या काँक्रिटीकरणापूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम किंवा जलवाहिनी बदलण्याचे काम करणे आवश्यक होते. मात्र स्मार्ट सिटी कंपनीने या गळतीकडे दुर्लक्ष करून काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. परिणामी आता काँक्रीट केलेल्या रस्त्यामधून गळतीद्वारे पाणी वाहत आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे उपनगरात पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जात नाही तर दुसरीकडे गळतीद्वारे पाणी वाया जात असते. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर गळतीचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.