उचगाव / वार्ताहर
गवताने भरलेली ट्रॉली घेऊन जाताना ट्रॉलीतील खांबाचा विद्युत प्रवाह करणाऱ्या तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किटने ट्रॅक्टर मधील गवताने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना वळीवडे ता करवीर येथील राधाकृष्ण बस स्टॉप जवळ मुख्य रस्त्यावर सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी वळीवडे येथील शेतकरी दिलीप श्रीपती पोवार आपल्या ट्रॅक्टर मधून प्रदीप तापेकर यांच्या जनावरांसाठी वाळलेले गवत, पिंजर, ट्रॉली मधून घेऊन घरी निघाले होते. दरम्यान वळीवडे- गांधीनगर या मुख्य रस्त्यावरील राधाकृष्ण बस स्टॉप जवळील विद्युत प्रवाह करणाऱ्या तारांचा झोळ कमी उंचीवरून लोंबकळत असल्याने ट्रॉलीतील वैरणीला त्याचा स्पर्श झाला. त्यावेळी दोन्ही तारांच्यामध्ये शॉर्टसर्किट होउन त्याच्या ठिणग्या ट्रॉलीतील वाळलेल्या गवतावर पडल्याने गंजीने तात्काळ पेट घेतला. ही घटना रस्त्यावरील काही नागरिकांनी पाहिली. नागरिकांनी आरडाओरड करत ट्रॅक्टर मधील ड्रायव्हरला आग लागल्याचे सांगितले. प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर मालकांने ट्रॉलीतील गवत रस्त्यावरच डम्पिंग केले. तेथील स्थानिक नागरिकांनी अग्निशामन दलाला पाचारण केले. दिड तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यामध्ये १८ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महावितरण कंपनीचा किती भोंगळ कारभार आहे हे लक्षात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकातून महावितरण विभागावर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
स्थानिक नागरिकांनी विद्युत खांबावरील तारांचा ताण कमी होऊन या विद्युत तारा लोंबकळत असल्याने येथे वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका लक्झरी बसचा या विद्युत प्रवाह करणाऱ्या तारांना स्पर्श होऊन पेट घेतला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे महावितरण विभागाने जातीने लक्ष घालून या विद्युत प्रवाह करणाऱ्या तारांची उंची वाढवून घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.