जगभरातल्या महिष कुळातला अत्यंत ताकदवान आणि महाकाय म्हणून ओळखल्या जाणाऱया गवारेडय़ांचा आज आपल्या अस्तित्वासाठी भारतभरातल्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संघर्ष सुरू आहे. 800 ते 1200 किलो वजन असलेला गवारेडा पट्टेरी वाघाचे भक्ष्य असून वाघापेक्षा वजनदार असला तरी वाघाच्या शिकारीतले चापल्य आणि जबरदस्त हल्ला करण्याच्या कौशल्यामुळे गवारेडा फस्त करण्यात वाघ यशस्वी ठरत असतो. झुडपे, पानगळती त्याचप्रमाणे सदाहरित जंगल प्रदेशात गवारेडय़ांचे वास्तव्य प्रामुख्याने असून, आज माळराने, मोसमी गवतांनी समृद्ध पठारे ही औद्योगिक वसाहती, शैक्षणिक प्रकल्प, पर्यावरणीय उपक्रम त्याचप्रमाणे अन्य विकास कामासाठी वापरली जात असल्याने, त्यांच्यासाठी अन्न, चारा, पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे मानव आणि गवारेडा यांच्यात संघर्ष निर्माण झालेला आहे. एकेकाळी माळरानावरती उगवणारे मोसमी गवत, त्याचप्रमाणे जंगली वनस्पतींचा पालापाचोळा, भेरली माडाची चुडते, कर्दळीची पाने, रान आंबे, फणसासारख्या बऱयाच घटकांचा गवारेडय़ांच्या आहारात समावेश व्हायचा परंतु आज कोणी काजू आणि अन्य बागायती पिकांसाठी डोंगरांचे उतार वृक्षवेली तोडून सपाट करू लागल्याने अशा परिसरात गवेरेडे लोकवस्तीकडे वळून शेती आणि बागायतीत प्रवेश करून तेथील उत्पादनावर ताव मारू लागलेले आहेत. त्यामुळे गवारेडय़ांच्या शिकारीत वाढ झालेली आहे.
गवारेडा हा तृणहारी प्राणी असून, त्याला जगण्यासाठी पाने, फुले, फळे, कंदमुळे यांनी युक्त अन्न आणि दरवेळी मोठय़ा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते. तामिळनाडूतील मदुमलाई, कर्नाटकातील बंदीपूर येथील जंगले गवारेडय़ांसाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हय़ातील राधानगरी तसेच दाजीपूरची जंगले गवारेडय़ांसाठी नैसर्गिक अधिवास ठरली होती परंतु आज अन्न, पाण्यासाठी कराव्या लागणाऱया संघर्षामुळे गवारेडय़ांचे दाजीपूरसारख्या सुरक्षित जंगलात दर्शन होणे दुरापास्त ठरलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या कळणे गावात आणि जवळच्या उगाडे येथील राखीव जंगलात गवारेडय़ांचे वास्तव्य होते परंतु लोह खनिजाच्या वारेमाप लालसेपायी जेव्हा कळणेच्या डोंगरावरती पर्यावरणीय संवेदनशीलतेची मुळीच दखल न घेता उत्खनन सुरू झाले, तेव्हा इथल्या गवारेडय़ांनी पेडणे तालुक्यातल्या हळर्णच्या डोंगरावरच्या राखीव जंगलात आश्रय घेतला. त्यामुळे पेडणेतील इब्रामपूर, हसापूर, चांदेल येथील शेती, बागायतीच्या पिकांची गवारेडय़ांकडून नासधूस नित्याचीच झाली आणि त्यात हळर्ण येथे गवारेडय़ाची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. दक्षिण गोव्यातल्या धारबांदोडय़ात महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानाच्या परिसराच्या पाच कि.मी.च्या परिघात ज्या 33 खाणी कार्यान्वित होत्या, त्यामुळे इथल्या गवारेडय़ांवरती विस्थापित होण्याची पाळी आली. संरक्षित वनात खाद्यान्न मिळणे कठीण झाल्याने, गवारेडय़ांनी आपला मोर्चा येथील अननसाच्या बागांकडे वळविला आणि विद्युतभारीत कुंपणात आठ गवारेडय़ांना मृत्यू आला. बागायतदाराने मेलेल्या आठ गव्यांना पुरून टाकले. वन खात्याने आठ गव्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱया गुन्हेगारांना पुराव्यानिशी अटक करूनही कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन, त्यांची मुक्तता करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यातल्या तिळारी धरणाच्या प्रकल्पामुळे आयनोडे, सरगवे, पाटये, शिरंगे, केंद्रे आदी गावे जलाशयाखाली आल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. सदर गावात बऱयाच ठिकाणी रबराची लागवड करण्यात आली आहे. येथे येणाऱया गवारेडय़ांची निर्घृणपणे शिकार करून, त्यांच्या मांसाची, शिंगांची शेजारच्या गोव्यात निर्यात केली जाते. यापूर्वी गवारेडय़ांच्या हत्येची आणि मांसाची विक्री करण्याची प्रकरणे उघडकीस येऊनदेखील गुन्हेगार उजळ माथ्यांनी फिरत आहे. तिळारी खोऱयात रबर, अननस, वनौषधी आणि अन्य नगदी पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याने, गवारेडय़ांना खाद्यान्न आणि पिण्याच्या पाण्याची समस्या प्रकर्षाने उद्भवलेली आहे आणि त्यामुळे गवेरेडे संरक्षित वनांचा त्याग करून लोकवस्ती, बागायती, शेतांकडे वळू लागलेले आहेत. अननस, केळी आणि बागायती पिकांबरोबर भाजीपाला गवे फस्त करू लागलेले आहेत. डोंगर उतारावरती लावलेल्या काजूच्या रोपांची नासधूस गव्यांमार्फत होत असल्याने शेतकरी, बागायतदार हादरलेले आहेत. तृणहारी गवेरेडे आज शेती, बागायती पिकांची नासधूस करू लागले आहेत, त्याला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अन्न, पाण्याची जी समस्या भेडसावू लागलेली आहे, ती कारणीभूत ठरलेली आहे. कुठे विद्युतभारीत कुंपणात, कुठे गोळीबाराद्वारे गव्यांची हत्या करण्याची प्रकरणे वाढत आहेत. डिचोलीत नार्वे-मये सीमेवरच्या दिवगाळी परिसरात गोळी घालून युवा गव्याच्या निर्घृणपणे केलेल्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वण-वाठादेव परिसरात जंगली श्वापदाच्या मांसाला चटावलेल्यांकडून गोळी घालून उद्भवलेले मनुष्यवध प्रकरण उघडकीस आले होते.
कर्नाटकात भीमगड अभयारण्य, अणशी-दांडेली व्याघ्र क्षेत्र, काळी व्याघ्रक्षेत्राच्या परिसरातील गावात गव्यांकडून शेती, बागायतीची होणारी नासधूस नित्याचीच झालेली आहे. सामाजिक वनीकरणांतर्गत वन खात्यानेच मोसमी गवतांनी समृद्ध पठारावरती, डोंगर उतारावरती अकेशिया, निलगिरीसारख्या विदेशी वृक्ष लागवडीला प्राधान्य दिल्याकारणाने, गव्यासारख्या तृणभक्षी प्राण्यांचा अन्न पाण्यासाठीचा संघर्ष विकोपाला पोहोचलेला आहे.
नैसर्गिकरित्या मोसमानुसार गवारेडय़ांसाठी जो आहार उपलब्ध असायचा तो शेती, बागायती, लोकवस्ती आणि रस्ते, लोहमार्ग, महामार्ग यांच्या होणाऱया विस्तारामुळे मिळणे दुरापास्त झालेला आहे. त्यामुळे गवेरेडे मोठय़ा प्रमाणात शेती, बागायती, पिकांची नासधूस करू लागलेले आहेत. या संदर्भात देण्यात येणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने आणि त्यासाठी प्रक्रिया वन खात्याच्या लालफितीत गुरफटलेली असल्याने ही समस्या आणखी गुंतागुंतीची ठरलेली आहे. वन व्यवस्थापन आणि जंगली श्वापदांसाठी अन्न, पाणी पुरविण्याची व्यवस्था निर्माण झाली तर गवारेडय़ांचे जगणे सुसहय़ होईल.