फोंडा व वास्को गट काँग्रेस समिती बरखास्त
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून वारंवार प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी होत असली तरी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते गिरीश चोडणकर यांना पदावरून हटविणार नसल्याचे स्पष्ट संकेत आत्ता मिळू लागले आहेत. हल्लीच काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी दिल्ली वारी केली होती व प्रदेशाध्यक्ष बदलावा असा सूर व्यक्त केला होता. मात्र, केंद्रीय नेत्यांनी त्यांना विशेष दाद दिलेली नाही.
गिरीश चोडणकर यांनी दोन वेळा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तो स्वीकारलेला नाही. गिरीश चोडणकर यांनी गोव्यात काँगेस पक्षाचे काम पुढे नेण्याचा सपाटा लावलेला आहे. पक्षाची संघटना बांधतानाच भाजप सरकारच्या विरोधातही मोहीम उघडलेली आहे व त्याचा वृत्तात दिल्लीला वेळच्यावेळी पोचत असल्याने केंद्रीय नेत्यांनी गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे.
काँग्रेस पक्षाने अन्य कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर पुढे जावे असा विचार गिरीश चोडणकर यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. गोव्यातील जनता भाजप सरकारच्या कामगिरीवर नाखुष आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला मोठी संधी असल्याने पक्षाने स्वबळावर पुढे जावे असे मत त्यांनी केंद्रीय नेत्यांकडे सुद्धा मांडलेले आहे. काँग्रेस पक्षाने अन्य पक्षांकडे युती केली तर काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी विजयी होऊ शकतो असे मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या हातातून कायम स्वरूपी निसटणार असल्याचे त्यांनी केंद्रीय नेत्यांना सांगितले आहे.
युतीसाठी पुढे येत असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष तसेच राष्ट्रवादी पक्ष यांनी भाजपकडे संधान बांधले होते. राज्यात जेव्हा काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकले असते, त्यावेळी दगा दिला. भाजप सरकार मंत्री मिळाले व त्यानंतर बाहेरचा रस्ता दाखविला, त्यामुळेच आज त्यांना भाजप वाईट वाटू लागला आहे व याच कारणास्तव ते काँग्रेसकडे युती करू पहात आहे असे मत गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले आहे.
फोंडा व वास्को गट काँग्रेस समिती बरखास्त
दरम्यान, गिरीश चोडणकर यांनी फोंडा व वास्को गट काँग्रेस समिती बरखास्त केली आहे. फोंडा गट काँग्रेस समितीवर रवी नाईक यांचे वर्चस्व होते. मात्र, रवी नाईक यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाने रवी नाईक यांनाच बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आत्ता तर फोंडा गट काँग्रेस समिती बरखास्त करून त्यांना स्पष्ट संकेतही दिला आहे. काँग्रेस पक्ष आपल्याला पुन्हा जवळ करणार नाही याची कल्पना असलेल्या रवी नाईक यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. लोक पक्ष पाहून नव्हे तर व्यक्ती पाहून मतदान करतात असे विधान देखील त्यांनी केले आहे. या विधानाची गंभीर दखल काँग्रेस पक्षाने घेतली आहे.