वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारामधून निव्वळ 474 कोटी रुपये काढलेले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी युरोप आणि अन्य देशामधील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे.
याअगोदर जून ते ऑगस्टपर्यंत सलग तीन महिने एफपीआयने भारतीय भांडवली बाजारात निव्वळ गुंतवणूक वाढल्याची नोंद केली आहे. यामध्ये ऑगस्टमध्ये 46,532 कोटी, जुलै 3,303 कोटी आणि जून महिन्यात 24,053 कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली आहे.
युरोपसह अन्य देशामधील वाढत जाणाऱया कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रभावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातून सावध भूमिका घेत एफपीआयने नफा कमाई केल्याचे सांगण्यात आले.
6 महिन्यापासून अशी स्थिती
डेट सेगमेंटमधील गुंतवणूक वाढल्यामुळे यामध्ये नवीन बदल होत गेला आहे. जवळपास 6 महिन्यांपासून अशी स्थिती पहावयास मिळाली आहे. एफपीआय भारतासह अन्य देशांमध्ये बाँड गुंतवणूक करत आहे. सदर गुंतवणुकीमधून अधिकचा परतावा मिळत असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.