भारताचे माजी परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थमंत्री जसवंतसिंह यांचे रविवारी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील एक कर्तबगार मंत्री आणि वाजपेयींचे हनुमान अशी त्यांची ख्याती होती. त्याचप्रमाणे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले. पोखरण अणुचाचणी नंतर अमेरिकेसह जगाने भारतावर लादलेले निर्बंध दूर करण्यासाठी त्यांनी जगभरात भारताची बाजू मांडली. भारतावरील निर्बंध हटवणे आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताचा दौरा करणे हे भारताच्या उत्कर्षासाठीचे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा संबंध येतो, कंदहारचे विमान अपहरण, जिना यांच्या बाबतीतील वक्तव्याचा प्रश्न येतो किंवा अफगाणिस्तानमध्ये तालिबान विरुद्ध अमेरिकेच्या लष्करी कारवाईसाठी भारताने साथ द्यावी या त्यांच्या भूमिकेवर चर्चा होते तेव्हा राजस्थानच्या वाळवंटात जन्मलेल्या या वाळवंटी वाघाची गणना वादळी व्यक्तिमत्त्वात होते. अर्थात मृत्यूमुळे हे वादळ आता कायमचे थांबले असले तरी इतिहासाची पाने जेव्हा कधी मागे-पुढे उलटवली जातील तेव्हा त्यावर चर्चा होतच राहील. गेली सहा वर्षे अंथरुणावर निपचित पडलेल्या या सैनिकाची बाजू कधीतरी उजळून निघेल अशी आशा करूया. भाजपच्या स्थापनेनंतर मंचावर चार प्रमुख व्यक्ती नेहमी विराजमान दिसायच्या. त्यात अटलजी, अडवाणी, राजमाता विजयाराजे शिंदे आणि चौथे असायचे जसवंतसिंह. राजस्थानच्या मारवाड भागात ज्यांना दाता म्हणून ओळखले जायचे. इंग्रजीवर प्रभुत्व, लष्करी संस्काराचे अदबशीर बोलणे, तितकेच वैचारिक लिहिणे यामुळे त्यांचा प्रभाव राजकारणात पडणे शक्मय झालेच. पण अशोक गेहलोत यांना त्यांच्या जोधपूर मतदारसंघातून लोकसभेला पराभूत करणे, जेथे पक्षाची ओळख देखील नाही अशा दार्जिलिंगसारख्या ठिकाणाहून लोकसभेवर जिंकणे, बारमेर, जैसलमेर, जोधपूर या पाकिस्तान सीमेलगतच्या प्रांतात वर्चस्व निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच जसवंतसिंह यांनी पाकिस्तानबाबत किंवा जिना यांच्याबद्दल केलेले वक्तव्य एक वैचारिक दृष्टीने पहावे की राजकीय दृष्टीने असा प्रश्न निर्माण होतो. 2009 साली त्यांनी जिना यांच्यावर जे पुस्तक लिहिले त्यात जिना स्तुती केली म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. पण, त्यातील जिना यांच्याबद्दलची वक्तव्ये ही ना. गोपालकृष्ण गोखले, महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांची वक्तव्ये होती. नायडू यांच्या ‘जिना हिंदू मुस्लिम ऐक्मयाचे प्रतीक’ या वक्तव्यानंतर फक्त 16 वर्षात काय बदल झाला की ते फाळणीचे पुरस्कर्ते झाले? या प्रश्नाचा पाठलाग म्हणजे ते पुस्तक होते. ज्यामध्ये त्यांनी फाळणीबद्दल नेहरू आणि सरदार पटेल यांना अधिक दोष दिला. अर्थात नेहरूंना दोष दिला असता तर वाद झाला नसता मात्र सरदार पटेल यांना दोष दिल्याने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तक्रार केली आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यांच्यावर कारवाई केली. पुढे अडवाणी यांनीही जिना यांचे कौतुक त्यांच्या समाधीवर जाऊन केले तेव्हा केवळ टीका झाली, कारवाई नाही! पुढे अडवाणी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांच्या मध्यस्थीने जसवंतसिंह यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. राज्यसभेत ते विरोधी पक्ष नेतेही होते. तेव्हा बोफोर्स तोफा वाईट नव्हत्या तर त्या खरेदी करण्याची पद्धत चुकीची होती. त्या वादात देशाला 64 कोटी (कथित भ्रष्टाचाराची रक्कम) पेक्षा खूप किंमत तपासासाठी मोजावी लागली आणि आजही संरक्षण क्षेत्राची खरेदी केवळ त्या आरोपांमुळे अडते. तेव्हा एकदाचा न्यायालयीन समिती नेमून हा विषय निकाली काढा असे म्हणणे या सैनिकाला महागात पडले. 2014 च्या निवडणुकीत तिकीट नाकारणे, त्यामुळे बंडखोरी आणि पक्षातून हकालपट्टी, शिवाय वसुंधराराजे यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या घरावर बुलडोजर चालवला जाणे हे खूपच अपमानजनक होते. मात्र अंतिम लढाईच्या पराभवासहीत अनेक हलाहल त्यांनी पचवले. घरगुती अपघातातून सहा वर्षे कोमानंतर त्यांना अखेर मृत्यूने सोडवले. 1998 मध्ये लाहोरला समझोता एक्सप्रेस आणि शांती संदेश घेऊन जाताना त्यांनी पाकिस्तानचे कपट जोखले नाही अशी टीका होते पण दोन राष्ट्रे युद्धाऐवजी शांतता आणि प्रगतीसाठी कायमची एकत्र यावीत या तळमळीकडे ही टीका हेतूत: दुर्लक्ष करते. मुशर्रफ यांच्याशी आग्रा करार होताना अडवाणी आणि यशवंत सिन्हा यांनी सिमला करार आणि अतिरेकी कारवायांचा उल्लेख करण्यासाठी धरलेला आग्रह आणि प्राथमिक कच्च्या तपशिलावर जसवंतसिंग यांची सही असल्याने मुशर्रफ यांनी त्याचा केलेला गैरवापर यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला. कंदहार विमान अपहरण प्रकरणी मौलाना मसूद अजहरला सोडायला जाणे त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे ठरले. पण त्यावेळी अपह्रत 164 जणांच्या कुटुंबीयांनी राजधानीत केलेली रडारड, देशांतर्गत दबाव, अतिरेक्मयांनी काही अब्ज रुपयांसह 36 अतिरेकी सोडायची मागणी केली असताना चर्चेतून तीनच अतिरेक्मयांच्या सुटकेवर त्यांना तयार करण्याचे सिंह यांचे योगदान विसरता कामा नये. अफगाणिस्तानमध्ये भारताने मदत करावी अशी अमेरिकेची तेव्हाही मागणी होती आणि आजही. अमेरिकेचा त्यासाठी मोदी सरकारवरही दबाव आहेच. तेव्हा लष्कराने नकार दिल्याने जसवंतसिंह चुकीचे ठरले. आता अमेरिकाच तालिबान्यांना सत्ता सोपवून मिटवून घेत आहे. त्यावेळी भारताचे प्रतिनिधीही मूकपणे का होईना उपस्थित राहात आहेत. जसवंतसिंह यांच्या भूमिकेला तपासण्याची आणखी एकदा संधी आली आहे. त्यांच्यासाठी फारसे कोणी अश्रू ढाळणार नाहीत पण काहींची औपचारिक श्रद्धांजली देशाला कधीच पुरेशी वाटणार नाही.
Previous Articleशंकर आणि पार्वती
Next Article गुंतवणूकदारांनी काढले विदेशी पोर्टफोलिओतून 474 कोटी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.