विधान परिषदेचे सभापती रामराजे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातल्या सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊनमुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशांची दयनिय अवस्था सुरु आहे. रोजची भूक भागवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यांच्यासोबत छोटेमोठे व्यावसायिकांचे हाल सुरु आहेत. पॉझिटीव्हीटी रेट कमी येवून सुद्धा लॉकडाऊन उठवला जात नाही. याला कारण जिह्यातील लोकप्रतिनिधींची गुपचिळीच आहे. शुक्रवारच्या बैठकीत अनलॉकबाबत कोणत्याही प्रतिनिधींनी चकार शब्द काढला नाही. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनी जरी जिल्हाधिकाऱयांकडे अनलॉकबाबत शब्द टाकला असता तरीही ऍनलॉकचा निर्णय सायंकाळीच जाहीर झाला असता. मात्र जिह्यातील लोकप्रतिनिधींनाच सर्वसामान्यांचे काही घेणेदेणे नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, कारवाईच्या भितीने व्यापाऱयांनी दुकाने शटर डाऊनच ठेवलेली आहेत.
सातारा जिह्यात लॉकडाऊन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवल्यात लागला गेला. तेव्हापासून शटरडाऊन आहेत. सध्या सातारा जिल्हा तिसऱया टप्यात आलेला आहे.या लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल सुरु आहेत. लादलेला लॉकडाऊन हा अनलॉक होईल याकरिता पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती, अशी आशा जिल्हावासियांना होती. मात्र, बैठकीचा केवळ फार्स ठरला. वास्तविक प्रशासनाकडून ज्या काही त्रुटी होत्या. त्यावर एकाही लोकप्रतिनिधींकडून बोलणे अपेक्षित होते अनलॉक करण्याबाबत सुचना मांडणे गरजेचे होते. सर्वसामान्य जनता आज रोजगार नसल्याने हाताला काम नसल्याने उपाशीपोटी लॉकडाऊन कधी उघडेल याकडे नजरा लावून बसलेली आहे. साताताऱयातील व्यापाऱयांकडूनही ऍनलॉक कधी होईल याबाबतच अपेक्षा आहे. मात्र, प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही. प्रशासन जो निर्णय घेईल तोच अंतिम असे असल्याने गेल्या आठवडय़ापूर्वी जो निर्णय होता तोच सध्या कामय ठेवला गेला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनीही कारवाईच्या भितीपोटी आपली दुकाने बंदच शनिवारी ठेवली होती.
पुढाऱयांना काहीच अडचण होत नाही
सर्वसामान्य जनतेलाच अगदी चटणी, मिठ संपले तरी बाहेर जावे लागते. दुकान बंद असले तर घरात आणणार कोठून कोरोनामुळे सर्वच लॉकडाऊन ठेवले गेल्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती सर्वसामान्यांची झालेली आहे. पुढाऱयांना तशी काहीच अडचण येत नाही. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांकडून जी अनलॉकडची मागणी होत आहे ती समजणार कशी?, आतापर्यंत केवळ खासदार उदयनराजे यांनी हाती कटोरा घेवून आंदोलन केले होते. तर आमदार शिवेंद्रराजेंनी अनलॉक करण्याची मागणी केली होती. या दोघांव्यतिरिक्त कोणीही प्रशासनाकडे साधी मागणी केलेली नाही. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांनाबाबत काही देणेघेणे नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामध्ये मग रामराजे असतील किंवा खासदार श्रीनिवास पाटील हे असतील यांच्यापासून तरुण फळीतील लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
सर्वसामान्यांना दोनवेळाच्या जेवणाची भिती
sंप्रत्येकाला जशी कोरोनाची काळजी आहे. तशीच घरात बसून घरातील व्यक्तींना खायला काय घालायचे याचीही काळजी आहे. मात्र, बाहेरही सारे काही बंद असल्याने घरातल्यांना काय खायला प्यायला आणायचे हा सर्वसामान्यांच्यापुढे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न आहे. त्यांना कोरोनाची भिती नाही तर दोन वेळच्या जेवणाची भिती आहे.