मानवी जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असते. मातृ देवो भव पासून सुरू होणारे आयुष्य अनुभव देवो भव पर्यंत मनुष्याला नेऊन पोहोचवते. तर कलाक्षेत्र, विशेषत: संगीताचे क्षेत्र हे असे आहे की ही विद्या गुरुमुखीच आहे असे म्हटले जाते. कारण ही प्रात्यक्षिकानेच शिकण्याची गोष्ट आहे. आज जरी संगीत विद्यालये, महाविद्यालये भरपूर प्रमाणात असली तरीही प्रत्यक्ष गुरुजींसमोर बसून परंपरेच्या चाकोरीप्रमाणे शिकणाऱया मंडळींची संख्या लक्षणीय आहे. या पद्धतीत प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणे तुलनेने अधिक प्रमाणात शक्मय होते म्हणून असावे कदाचित. दुसरे असे की कलेचा प्रवेश आणि प्रवासही आतून बाहेरच्या दिशेने होत असतो आणि विद्या ही बाहेरून अंत:करणात प्रवेश करत असते असे म्हटले जाते. म्हणजे आत मुळात संगीतप्रेमाचा आणि बुद्धीचा झरा असल्याशिवाय बाहेरून आत जाणाऱया विद्येचे चीज होऊ शकत नाही. शिवाय संगीतकलेत ज्या गोष्टींचे अध्ययन करायचे असते त्यांचे आकृतिबंधही aंstraम्t असतात. त्यावर नेमका हात पडणे आणि समजणे आकलन होणे ही प्रक्रिया, लिहिलेले पुस्तक वाचून शिकण्यासारखी सोपी नसते. त्यामुळे या क्षेत्रातले गुरुंचे स्थान अनन्यसाधारणच होय. आज गाणे शिकणाऱयांना मनमुराद ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी यूटय़ूबसारखी साधने सर्व सोशल साइट्स यावर गाण्याचा महासागर उपलब्ध आहे. तरीही समोर बसून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आजही उडय़ा पडत असतात. यावरून संगीतातल्या लोकांसाठी ‘गुरु’ चे महत्त्व काय आहे हे कळावे! लॉकडाउनच्या या काळात प्रत्यक्ष समोर बसून शिकणे दुरापास्त झालेले असताना निदान झूमवरून तरी शिकावे, व्हीडिओ कॉन्फरन्सवर तरी त्यांचे गाणे अनुभवावे यासाठी कच्च्या नेटवर्कवर मात करून वरच्या देवळांमधून, टेकडय़ांवरून बसलेले कितीतरी गानपागल बघितले की आणखीनच जाणवते हे! याचप्रमाणे प्रत्यक्ष शिकवता येत नाही म्हणून तळमळणारे हाडाचे शिक्षकही फोनवरून गाण्याची तालीम विद्यार्थ्यांना देताना दिसतात. तेही तासन्तास. लगन म्हणतात ती हीच असते का?
या क्षेत्रातल्या मोठय़ा माणसांनी त्यांच्या त्यांच्या संगीतगुरुंबद्दल लिहून ठेवलेले आहे. संगीताच्या गोडीचे वेडात रूपांतर होते तेव्हा त्या वेडाला अभ्यासाच्या चाकोरीत लावून, रियाजाचे वळण आणि चिंतनाची सवय गुरु विकसित करत असतात. शिष्यांना शिकवताना त्या आनंदात ते इतके रममाण होत असतात की गाण्यात आधी स्वत: कसं रमावं की ज्यामुळे इतरांना आनंद मिळेल याचा जणु वस्तुपाठच शिष्यांना यातून मिळत असतो. आपण शिकविलेल्या सुरावटी जेव्हा शिष्याच्या गळय़ातून किंवा वाद्यातून जशाच्या तशा निघतात तेव्हा त्यांना मिळणारा आनंद वेगळाच असतो. आपल्याला एखाद्या बाबतीत येणारी शंका आपण कुणाही तज्ञाला विचारली तर उत्तर मिळतेच पण त्याच शंकेचे निरसन आपले गुरु जेव्हा करतात तेव्हा उत्तराबरोबरच समाधानही मिळते कारण ते नुसते उत्तर नसते तर आपल्याला उमजेल अशा भाषेत केलेले ते समाधान असते. आपली संकल्पना त्यामुळे पक्की होत असते. मनाची अनेक अंधारी दालने त्यामुळे प्रकाशाने उजळून निघतात. आपल्या गुरुंचा साधा उल्लेख जरी झाला तरी प्रतिक्षिप्त क्रियेने चटकन कानाची पाळी पकडली जाते ती काही उगाचच नव्हे. त्यापाठी आदराची, प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना असते. संगीताची दुनिया अजब आणि अगाध आहे. त्यात अपार आनंद आहे. त्या आनंदाचा अनुभव घ्यायला शिकणारा माणूस जितका अभ्यास करील तितका तो विकाररहित होत जातो असे म्हणतात. इतका मौल्यवान अनुभव आपल्याला ज्या गुरुंमुळे मिळतो त्यांची आपली कधी ताटातूट होऊच नये आणि असाच आनंद आपल्याला सतत मिळावा असे वाटल्यास नवल ते काय?
संगीताची आवड असणे हे निराळे आणि उत्तम गुरुंचे मार्गदर्शन मिळून त्यातील दृष्टी येणे हे वेगळे! शिकवण्याने खरं तर शिकवणाऱयालाच जास्त फायदा होतो. गुरु शिष्याला शिकवत असताना त्याला संगीतातले मर्म कळत जात असते त्याचप्रमाणे तेही अधिकाधिक अनुभवसंपन्न होत जातात. चांगले गुरु हे प्रत्येक शिष्याची आवड आणि वकूब पाहून त्याला कोणत्या पद्धतीने शिकवावे हे ते निश्चित करतात. आणि या नात्यात संपूर्ण विश्वास, नि÷ा आणि संगीताप्रति समर्पण अपेक्षित असते. त्याशिवाय उभयतांमध्ये भावनिक मोकळेपणा येत नाही. आणि तसा तो आला की रंगलेली गुरुशिष्यांची बैठक काय वर्णावी? सलग दहा बारा वर्षे एकाच व्यक्तीकडे शिकणाऱया शिष्याचे आणि गुरुचे सांगीतिक आणि भावनिक बंध विकसित होत गेलेले पाहणे हा मोठा साश्चर्यानंद होय! कारण प्रथमत: गुरुजी त्याच्या आवाजाला वळण लावतात. त्यावर त्याचे स्वर तयार करून घेतात. मग रागांची चौकट आणि त्यावर अनंत असणारा रागविचार आणि सतत होणारे परिष्करण असा मोठा, न संपणारा प्रवास ते दोघे करत असतात. सर्व शिष्यांवर जरी गुरुंची माया असली तरीही काही शिष्य निकटचे होतातच. त्यापाठी त्या शिष्याची संगीतावर प्रामाणिक नि÷ा आणि गुरुंचे सांगणे प्रमाण मानून केलेला अनंत रियाज असतो. खरोखरच आपण त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि रियाज करत राहिलो तर आपल्या आवाजात आणि विचारात पडत जाणारा फरक आपल्याच लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि तीच सुखद जाणीव विरते न विरते तोपर्यंत समोर असणारा आपल्या अज्ञानाचा महासागरही आपल्याला दिसतो. आपण सतत क्षितिजाचा पाठलाग करत राहतो. ही न संपणारी प्रक्रिया सुरू करून देण्याचे काम गुरु करीत असतात. या प्रवासात अनेक माणसांना गुरु म्हणून पत्करावे लागते. अनेक दिशा बदलतात. संगीताची आवड असणारे आपले आईवडील किंवा नातेवाईक, आपल्या शाळेतले संगीत शिक्षक आपल्याला गुरु म्हणून लाभतात. मग परीक्षा द्यायला सुरुवात झाली तर माणूस एखाद्या व्यावसायिक कलाकाराकडे जायला लागतो. मग एक दिवस असा येतो की त्याचेही कार्यक्रम सुरू होतात आणि समोरचे श्रोतेही बरंच काही शिकवून जातात. तर कधी कधी एखादा शिष्यही गुरुला शिकवून जातो. परस्परांचे सांगीतिक स्वभाव, व्यक्तिमत्त्वे जेव्हा एकमेकांना पूरक असतात, तेव्हा गुरुशिष्यांच्या दीर्घकाळ किंबहुना सर्वकाळ टिकणाऱया जोडय़ा निर्माण होतात. म्हणूनच खूप दिवस त्यांची भेट झाली नाही तर तळमळ लागून राहते आणि केव्हा एकदा त्यांचे दर्शन घेतो आणि त्यांच्यासमोर बसून नवनवीन शिकण्याचा आनंद घेतो असे शिष्याला होते. म्हणून ते नुसते दिसले जरी, तरी अपार आनंद मनाच्या तळातून उन्मलून येऊ लागतो.
शिकवताना गुरु हे माउली असतात. साथीला घेतात तेव्हा सावली असतात. सांगीतिक चर्चा करताना मित्र असतात. शिष्याला स्वतंत्र मैफिलीसाठी तयार करताना पाठीराखे असतात.चुकांसाठी कठोर तर क्षमा करताना थोर असतात. नाते दृढ झाल्यावर हक्काने शिष्याकडे जाताना घरचेच माणूस असतात. बहुआयामी असणारे हे व्यक्तिमत्त्व दीपस्तंभ होऊन सतत शिष्याला वाट दाखवत असते. ‘गुरु एक जगी त्राता’ ऐकताना प्रत्येकाला हीच भावना जाणवत असेल आणि कृतज्ञतेच्या आदराच्या भावना उचंबळून येत असतील तर नवल नाही.
अपर्णा परांजपे-प्रभु