लोकसभेत जोरदार मागणी : विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लखीमपूर खेरी प्रकरणावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी शुक्रवारीही संसदेमध्ये लावून धरली. राजीनाम्याच्या मागणीवरून लोकसभेत सलग तिसऱया दिवशी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेले विरोधी पक्षाचे सदस्य लखीमपूर खेरी प्रकरणातील एसआयटीच्या अहवालानंतर अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यास कडाडून विरोध करत आहेत.
लखीमपूर खेरी घटनेवरून भाजप आणि केंद्र सरकारला घेरण्याची संधी विरोधक सोडत नाहीत. शुक्रवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील बहुतांश विरोधी पक्षांनी एसआयटीच्या अहवालाच्या आधारे अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पोस्टर, बॅनर घेऊन वेलमध्ये घोषणाबाजी केली. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना पश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याची विनंती केली, मात्र विरोधी खासदार आक्रमक झाले. मात्र गोंधळ थांबत नसल्याचे पाहून सभापतींनी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. पुन्हा सभागृह सुरू असतानाही विरोधकांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ सुरूच ठेवला.
सरोगसी विधेयक लोकसभेत मंजूर
सभागृहात लखीमपूर खेरी प्रकरणावरून सुरू असलेल्या गदारोळातच सरकारने सरोगसी विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले. राज्यसभेने हे विधेयक आधीच मंजूर केले आहे. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गदारोळात सरकारने आणखी तीन विधेयकेही मांडली. विरोधी सदस्यांचा गदारोळ थांबत नसल्याचे पाहून पीठासीन सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले.