उसगांव येथील बैठकीत मनोज परब यांचे आवाहन
वार्ताहर /उसगांव
येत्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीयांच्या हितासाठी आरजीचे सरकार स्थापन करणे किती महत्त्वाचे आहे. हे मतदारांना पटवून देण्यासाठी आरजीतर्फे उसगांवात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले.
गुरुवारी रात्री धावशिरे, सोनारबाग व धाटवाडा येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले. आरजी प्रमुख मनोज परब यांनी मतदारांना अनेक मुद्दे पटवून सांगितले. सरकार स्थापन झाल्यास गोमंतकीयांच्या कलाण्यासाठी तयार केलेले पोगो बिल पास करणे, 80 टक्के गोमंतकीयांना खासगी क्षेत्रात नोकरीसाठी प्राधान्य, कोमुनिदाद जागेचा 100 टक्के गोमंतकीयांना लाभ, हाऊसिंग प्रकल्पात गोमंतकीयांनाच निवासस्थाने, सरकारच्या विविध योजनांचा केवळ गोमंतकीयांना लाभ व वाहतूक ठेका, लिलाव, कामगार ठेका अशा विविध क्षेप्तात गोमंतकीयांना संधी मिळाव्यात यासाठी आरजीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मनोज परब यांनी केले.
गेल्या 60 वर्षात सत्तेवर आलेल्या एकाही सरकारने गोमंतकीयाच्या फायद्याचा एकही कायदा तयार केला नाही. मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर सरकारच्या सुविधा बिगर गोमंतकीयांना झटपट मिळतात तर गोमंतकीयांना सरकारी कचेरीत फेऱया माराव्या लागतात. राजकारण्यांच्या आशीर्वादाने बिगर गोमंतकीयांनी कोमुनिदाद जागा बळकावलेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात हजारो बनावट बिगर गोमंतकीय मतदार कार्डे तयार केली आहे. ही बनावट कार्डे रद्द करण्याचे काम आरजीने केले आहे. आरजीतर्फे निवडणूक लढविणाऱया उमेदवारांकडून मतांची भिक मागणार नाही व मतांसाठी पैसेही देणार नाही असे मनोज परब यांनी ठासून सांगितले.