एकूण 23 कामगारांना दिला ब्रेक
प्रतिनिधी /मडगाव
गोवा डेअरीत नोकर भरतीची कोणतीच आवश्यकता नसताना देखील केवळ प्रियोळ मतदारसंघातील निवडणूक डोळय़ा समोर ठेऊन करण्यात आलेली नोकर भरती वादात सापडली होती. आत्ता सरकारचा कोणताच हस्तक्षेप होत नसल्याने गेल्या वर्षभरात नोकरीत सामावून घेतलेल्या 23 कामगारांना गोवा डेअरीने अखेर कात्री लावली आहे. या कामगारांना ब्रेक दिला आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी एकूण 12 आमगारांना ब्रेक दिला होता. त्यानंतर काल शनिवारी आणखीन 11 जणांना बेक देण्याचा निर्णय घेतला. गोवा डेअरीचे माजी व्यवस्थापकी संचालक काशी नाईक यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. सद्या ते गोवा डेअरीत ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. गोवा डेअरीची आर्थिक बाजू नाजूक असताना देखील नोकर भरती करण्यात आल्याने दूध उत्पादक शेतकऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
प्रियोळ मतदारसंघातील निवडणूक नजरेसमोर ठेऊन गोवा डेअरीत गेल्या वर्षभरात नोकर भरती करण्याचा सपाटा लावण्यात आला होता. निवडणुकीत जिंकून येण्यासाठी हा सर्व खटाटोप होता. निवडणुकीत या लोकांना वापर करण्यात आला. परंतु, त्यांना नोकरीची ठोस हमी देण्यात आली नव्हती. आत्ता विधानसभेची निवडणूक झाली व सद्या आचार संहिता जारी असल्याने सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. हीच संधी साधून गोवा डेअरीच्या प्रशासकीय मंडळाने गेल्या वर्षभरात करण्यात आलेली नोकर भरतीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला.
सुरवातीला 12 व काल शनिवारी मिळून 23 कामगारांना ब्रेक देण्यात आला. हा बेक सद्या तरी कायम स्वरूपी मानला जात आहे. गोवा डेअरीत राजकीय हस्तक्षेप प्रचंड वाढला होता. नोकर भरती करताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. जणू काही आपली खाजगी मालमत्ता असल्यागत राजकारणी वागत होते. सुरवातीला माजी सहकारमंत्री महादेव नाईक यांनी मोठय़ा प्रमाणात नोकर भरती केली होती. तेव्हापासून गोवा डेअरीवर आर्थिक बोजा पडला होता. त्यात गेल्या वर्षभरात पुन्हा नोकर भरती करण्यात आल्याने परिस्थिती आणखीन बिघडली होती अशी प्रतिक्रीया गोवा डेअरीचे माजी चेअरमन तथा प्रियोळचे दूध उत्पादक शेतकरी अनुप देसाई यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी सहकारमंत्री झालेले प्रकाश शंकर वेळीप, विनय तेंडुलकर, दीपक ढवळीकर यांनी कधीच गोवा डेअरीच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप केला नव्हता. त्यामुळे गोवा डेअरीचा कारभार सुरळीत चालू होता. मात्र, त्यानंतर राजकीय हस्तक्षेप वाढल्याने गोवा डेअरीची परिस्थिती नाजूक बनली होती असे अनुप देसाई म्हणाले.
गोवा डेअरीने आपल्या उत्पादनाचे मार्केटींग करणे आवश्यक असून जो पर्यंत प्रभावी मार्केटींग होत नाही. तो पर्यंत गोवा डेअरीची आर्थिक बाजू सावरणे कठीण जाणार असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. आज अनावश्यक नोकर भरतीला कात्री लावण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो उचित असून नोकर भरतीमुळे गोवा डेअरीवर ताण येत असतो. आज गोव्यात दूध उत्पादन वाढविण्याची गरज असून त्या दृष्टीकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे असे मत त्यांनी मांडले आहे.