गोवा सुराज पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार : आझाद मैदानावर झालेल्या सभेत घोषणा
प्रतिनिधी /पणजी
राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकवेळी केवळ सत्ता मिळविण्यासाठी व स्वहितासाठी विविध विषयांवर तडजोड करून गोव्यातून मूळ गोमंतकीयांना हद्दपार करण्याचा कट रचला आहे. त्याला रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) सुरुंग लावणार आहे. गोवा राखण्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्स सज्ज झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत गोवा सुराज पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी पणजी येथे केली. याबाबतचे सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आल्याचे परब यांनी सांगितले.
आझाद मैदानावर रविवारी झालेल्या जाहीर सभेदरम्यान विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट, धोधो पाऊस सुरु असतानाही चक्क खुर्च्या डोक्यावर घेऊन सुमारे चार हजारहून अधिक मूळ गोमंतकीय युवायुवतींनी सभेत उपस्थित राहून प्रतिसाद दिला. ‘आमचे गोंय आमका जाय, उजो’ अशा घोषणा देत आझाद मैदान व परिसर दणाणून सोडला. यावेळी युवावर्गाच्या घोषणाबाजीसह ढोल ताशेही वाजत होते. मुसळधार पावसातही रिव्होल्युशनरी गोवन्सची मशाल रखरखीत पेटत होती.
रिव्होल्युशनरी गोवन्सच्या तत्वांवरच निवडणूक लढविणार!
रिव्होल्युशनरी गोवन्स ही केवळ सात गोमंतकीयांनी सुरू केलेली एक चळवळ होती. गेल्या 4 वर्षे 8 महिन्यांच्या कार्यकाळात आम्ही समाजात जाऊन काम केले तेव्हा आमच्या लक्षात आले की जी आग आमच्या हृदयात धगधगते तीच आग अनेक मूळ गोमंतकीयांच्या हृदयात पेटत आहे. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही हे कार्य हाती घेतले व गोमंतकीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. याला घाबरून विद्यमान सरकारने सरकारी यंत्रणांचा वापर करून त्रास देणे, कामात अडथळे आणण्याचा प्रयत्नही केला. म्हणून रिव्होल्युशनरी गोवन्सची राजकीय पक्ष म्हणून नोंद करून निवडणुकीत उतरण्याचे आम्ही निश्चित केले. त्यातही विनाकारण अनेक अडचणी निर्माण केले. अखेर देवानेच आम्हाला साथ दिली. गोवा सुराज पार्टीच्या पदाधिकाऱयांनी आमची चळवळ पाहिली आणि गोवा सुराज पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे सूचविले. केवळ चिन्ह गोवा सुराज पार्टीचे असेल मात्र निवडणुकीत उतरण्याची तत्वे ही रिव्होल्युशनरी गोवन्सची असणार, असेही मनोज परब यांनी सांगितले.
विकासाच्या नावाखाली गोमंतकीयांच्या जमिनी बळकावल्या!
आतापर्यंत गोव्यात सत्तेवर आलेल्या प्रत्येक पक्षाच्या सरकारने केवळ गोवा लुटण्याचे काम केले आहे. मूळ गोमंतकीयांना गोव्यात राहणे नकोसे करून टाकले आहे. गोमंतकीयांच्या जमिनी लुबाडून मोठमोठय़ा बिल्डरच्या घशात घातल्या आहेत. इतर प्रांतातील पैसेवाले गोव्यात जमिनी, घरे घेतात त्यांच्यासाठी कायदा वेगळा व गोमंतकीयांना वेगळा असा प्रकार होत आहे. आजपर्यंत सरकारने एकाही गोमंतकीयांचा प्रश्न धसास लावला नाही, उलट गोमंतकीयांचा विरोध असतानाही केवळ अदानी, अंबानींची पक्षावरील कृपा राखण्यासाठी गोमंतकीयांना नाहक त्रास दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
झाले ते खूप झाले आता पुढे नको!
प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली व्होट बँक तयार करण्यासाठी बेकायदेशीररित्या परप्रांतियांना गोव्यात थारा दिला. इतकेच नव्हे तर त्यांना निवासी दाखलेही मिळाले. त्यामुळे सरकार ज्या नोकऱया देण्याच्या घोषणा करीत आहेत त्यात 70 टक्के परप्रांतीय असणार. आज कुठल्याही सरकारी कार्यालयात पाहिल्यास परप्रांतीय अधिक दिसतात, त्याला हे राजकीय लोकच जबाबदार असल्याचा आरोपही मनोज परब यांनी केला. आतापर्यंत झाले ते खूप झाले आता यापुढे हे बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठीच रिव्होल्युशनरी गोवन्स संघटना पुढे सरसावली आहे. आज जर आम्ही हे केले नाही तर कालांतराने मूळ गोमंतकीय गोव्यात शोधून सापडणे मुश्किल होईल, असेही परब म्हणाले.
गोवा गोमंतकीयांसाठी राखणे हाच आमचा प्रयत्न
विश्वेश नाईक व विरेश नाईक यांनी गोवा रिव्होल्युशनरीच्या जडण घडणीविषयी सविस्तर माहिती दिली. आझाद मैदानावर सभा सुरू होण्यापूर्वी उपस्थित जनसमुदयाची घोषणाबाजी सुरुच होती. गोव्याचे पारंपरिक वाद्य ढोल, ताशांचा आवाज त्यात मोठय़ा जिद्दीने गोवा वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या युवा युवतींच्या उत्स्फूर्त घोषणा अंगावर शहारे आणणाऱया होत्या. नितीन आरोंदेकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
अन्……मनोज परब भाऊक झाले
गोवा सुराज पार्टीच्या पदाधिकाऱयांनी निवडणूक लढविण्यासाठी दिलेली मान्यता आणि आझाद मैदानावरील मूळ गोमंतकीय युवा युवतींचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून गोव्याच्या रक्षणासाठी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची वाट मोकळी झाली आहे, असे सांगताना मनोज परब भाऊक झाले. त्यांच्या डोळ्य़ातून अश्रू तरळले. यावेळी त्यांच्या इतर साथीदारांचेही डोळे पाणावले.