गोयचो आवाज संघटनेची टीका
प्रतिनिधी / पणजी
राज्यात साधनसुविधांच्या नावाखाली सरकार जे मोठमोठे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. ते गोमंतकीयांच्या विकासासाठी नसून सरकारच्या मर्जीतील काही मोजक्याच लोकांच्या हितासाठी आहेत. गोयचो आवाज या प्रकल्पा विरोधात ठाम उभा रहाणार असून सरकारचा आम्ही निषेध करीत असल्याचे गोयचो आवाज चे कन्वेनर पॅप्टन विरीयाटो फर्नांडिस यांनी सांगितले. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करण्याचा सरकारने विडा उचललेला आहे असेही फर्नांडिस यांनी सांगताना मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांच्यावर खरपूस टीका केली.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फर्नांडिस बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत निनिनो कुरय्या, प्रमोद नाईक, दत्तगुरु कवळेकर कार्मेन कुरय्या व इतर मान्यवर उपस्थित होते. लोकांच्या विरोधाला डावलून सरकार मनमानी कारभार करीत आहे. लोकांना नको असलेले प्रकल्प आणण्याचा आटापीटी सरकार का करीत आहे असा प्रश्न फर्नांडिस यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षाने विधानसभेत काही प्रमाणात प्रकल्पाना विरोध दर्शविला मात्र त्याला आता खूप उशीर झाला आहे. एकंदरीत सगळेच आमदार मंत्री एकाच माळेचे मणी बनले असून प्रत्येकजण आपला फायदा कसा होईल याचाच विचार करीत असल्याचे दिसून येत आहे. गोव्याचा आणि गोमंतकीयांच्या भविष्याचे कुणालाच काही पडलेले नसल्याचे दिसून येत आहे असेही फर्नांडिस म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हादई नदी आपली आई म्हणतात तर दुसऱया बाजूने म्हादई कर्नाटकाला देऊन टाकली आहे. जी व्यक्ती आपल्या आईलाच विकतो ती व्यक्ती गोव्याचे भले कसेकाय करणार अशी टीकाही फर्नांडिस यांनी केली. म्हादई नदी ही गोवेकरांची संजीवनी आहे. ती कर्नाटकात वळवायला पूर्णपणे गोवा सरकार जबाबदार असल्याचा आरोपही फर्नांडिस यांनी केला आहे. आता एकझूटीने लढणे गरजेचे आहे. आज नाही तर कधीच नाही सुंदर शोबीत गोव्याचा नाश होताना दिसत आहे. आजच एकत्रीतपणे लढा देणे गरजेचे आहे. विद्यमान मंत्र्यांना घरी पाठवून गोव्याचा होणार नाश टाळूनया असे आवाहन फर्नांडिस यांनी केले आहे.