गोवा ’टीएमसी’चे आश्वासन : गोव्यासाठी तीन भेटींची दिली माहिती
प्रतिनिधी /पणजी
गोवा तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आज गोमंतकीयांना ‘गृहलक्ष्मी’, ‘युवा शक्ती’ आणि ‘माझे घर, मालकी हक्क’ या तीन भेटींची माहिती दिली. पणजीतील पक्ष कार्यालयात टीएमसी नेते कीर्ती आझाद आणि गोवा ’टीएमसी’ नेत्या अविता बांदोडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
गोवा ’टीएमसी’च्या गोमंतकीयांसाठीच्या दृष्टिकोनावर बोलताना बांदोडकर यांनी, ‘60टक्के पेक्षा जास्त गोमंतकीयांना जमिनीचा हक्क नाही. सुमारे 20 हजार मुंडकार प्रकरणे अद्याप मामलेदारांकडे प्रलंबित आहेत. आजही गोव्यातील 50 हजार पेक्षा जास्त कुटुंबांकडे जमीन किंवा घरे नाहीत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न भाजपने किंवा काँग्रेसने केला नाही. परंतु ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली गोवा ’टीएमसी’ने ‘माझे घर, मालकी हक्क’ लाँच केले आहे. त्याद्वारे प्रत्येक गोमंतकीयाला त्यांच्या ताब्यातील जमीन वा घराची मालकी मिळेल. एवढेच नव्हे तर बेघर कुटुंबांना 50 हजारहून अधिक अनुदानित घरे दिली जातील.“
पुढे बोलताना बांदोडकर म्हणाल्या, ‘आमच्या घरोघरी जाण्याच्या मोहिमेदरम्यान घर नसल्यामुळे पिढय़ानपिढय़ा त्रस्त असलेल्या लोकांना भेटले. त्यांचे दुःख आम्हाला संपवायचे आहे.“
या योजना कशा व्यवहार्य आहेत हे सांगताना श्री. आझाद म्हणाले, ‘गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेला रु. 5000 प्रति महिना. गोव्यात या योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वित्त मंत्रालय आणि ’आरबीआय’आम्हाला आर्थिक तरतूद उपलब्ध करून देतील. जर आपण गृहलक्ष्मी आणि युवा शक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर दोघांसाठी लागणारे वार्षिक बजेट एकूण बजेटच्या 10टक्के पेक्षा कमी असेल, जे सहज शक्मय आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर 250 दिवसांच्या आत सर्व योजना लागू करू. आमच्या घरोघरच्या मोहिमेदरम्यान आम्हाला जाणवले आहे की, लोक आमच्या आश्वासनांना स्वीकारतात आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’
‘बाहेरचा’ पक्ष असल्याचा आरोपावर आझाद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आणि एक टोकदार प्रश्न उपस्थित केला, ‘रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाष बोस हे बंगालचे आहेत की भारताचे? शिवाजी महाराज मराठी की भारतीय? आम्ही बाहेरचे आहोत तर पंतप्रधान मोदी दिल्लीत काय करत आहेत?
गोव्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि राज्यात शांतता, समृद्धी आणि बंधुता वाढवण्यासाठी ’टीएमसी’ संघर्ष करेल, आझाद पुढे म्हणाले.