प्रतिनिधी /वास्को
गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी योग्य प्रमाणात उमेदवार उभे करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडे क्षमता असून राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करतील. काँग्रेसकडे यापुढे युतीविषयी बोलणी होणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबतीने निवडणुकीत उतरणार असून अन्य समविचारी पक्षानी आमच्याशी युती करण्याची तयारी दर्शवल्यास त्यांचेही स्वागत असेल असे माजी केंद्रीयमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. दाबोळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजीमंत्री जुझे फिलीप डिसोजा, उद्योजक प्रफुल्ल हेदे, प्रितम नाईक व पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. मात्र, गोव्यातील काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडलेल्या नाहीत. त्यामुळे युतीच्या प्रश्नावर त्यांच्याशी या पुढे बोलणी होणार नाही. या पक्षाला 15 आमदार सोडून गेल्यानंतरही स्वबळावर निवडणुक लढण्याची ईच्छा आहे. स्वबळावर जिंकू असे त्यांना वाटते. त्यांचे ते पाहून घेतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात 99 सालापासूनच आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वी अनेक मंत्री व आमदार होऊन गेलेले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुरेसे उमेदवार देण्याची आमच्या पक्षाची क्षमता आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही निवडणुक लढवणार आहोत. आम्ही योग्य प्रमाणात उमेदवार उभे करणार आहोत. शिवसेनेच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुक लढवेल. अन्य समविचारी पक्षानी आमच्याशी युती करण्याची तयारी दर्शवल्यास त्यांनाही समावून घेण्यात येईल असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.