सत्तरीत पाच दिवसांपासून अग्नितांडव : बार्देश, मुरगाव, धारबांदोड्यातही पोहोचला वणवा,आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात
पणजी, वास्को, वाळपई, धारबांदोडा : गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच असून परिस्थिती अग्निशामक दलाच्या आवाक्याबाहेर जात आहे. आगीमुळे अनेक डोंगर भस्मसात होऊन गेले आहेत. कोट्यावधी रुपयांची हानी झाली असून वनस्पतींच्या दुर्मीळ जाती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सत्तरीतील काही डोंगरांवरील आगी आटोक्यात आल्या आहेत, मात्र नावता-कुठ्ठाळी, पर्रा व साकोर्डे येथे नव्dयाने वणवा पेटला आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी आगी नैसर्गिकरित्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा घेतलेल्या आढावा बैठकीत कृत्रिम आगीची शक्यता फेटाळली नाही. दरम्यान बुधवारी पिसुर्ले येथील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कुठ्ठाळीत डोंगराला आग लागली. पर्रा डोंगराला लागलेली आग आटोक्यात आली आहे. पारवाड कर्नाटकमार्गे लागून आलेली आग गोव्यातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने विझविण्यात यश आल्याने काही डोंगर वाचले आहेत. वाघेरी डोंगराला लागलेली आगही आता नियंत्रणात आली आहे.
गोव्यात विशेषत: सत्तरीतील डोंगराना तीन दिवसात अनेक ठिकाणी ज्या आगी लागल्या त्यावरून संशय निर्माण झालेला आहे. काल बुधवारी आगीचे प्रकार अन्य तालुक्यांमध्ये म्हणजे धारबांदोडा, मुरगाव व बार्देश तालुक्यातही घडले. वनखात्याने नौदलाच्या हॅलिकॉप्टरचा वापर करून डोंगरावर पाण्याचे फवारे उडवून आग आटोक्यात आणली. आणखी विस्तारली जाऊ नये यासाठी नौदलाची दोन हॅलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
राजनाथसिंग यांच्याशी राणे यांची बोलणी
गोव्यातील विविध डोंगराना लागलेल्या आगीमुळे गोव्याचे वनवैभव जळून नष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री विश्वजित राणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशी बुधवारी सकाळी फोनद्वारे चर्चा केली. त्यांनी हवाई दलातर्फे आवश्यक ते पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. राणे यांनी नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून काणकोण ते पेडणेपर्यंतच्या सर्व डोंगराची पहाणी केली. सर्वत्र आग आटोक्यात आल्याचे त्यांना दिसले. काही ठिकाणी आग धुमसत होती. त्याठिकाणी ती विझविण्यासाठी माणसे पोहोचलेली होती, असे मंत्री विश्वजित राणे म्हणाले.
धारबांदोड्यात तीन दिवस धुमसतेय आग
धारबांदोडा तालुक्यात मंगळवारी अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले असून ही आग कशामुळे लागत आहे? असा सभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील सिद्धा डोंगरावर गेल्या तीन दिवसापासून आगीचा भडका उडाल्याने त्याची धग डोंगरच्या बाजुला असलेल्या बेंडला अभयारण्यापर्यंत पोचण्याची भिती आहे. त्या घटनेकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी या भागात दिवाळीच्या दिवसात वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे कदाचित वीज वाहिन्यांचा एकमेकांशी संपर्क होऊन वीज पडल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी कुळे शिगांव पंचायत क्षेत्रातील पिकळेवाडी येथील मळाला आग लागल्याचा प्रकार घडला. येथील ग्रामस्थांनी व पंचायत मंडळातील काही सदस्यांनी आग विझविण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने कुडचडे येथूल अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली.
या घटनेच्या चार पाच दिवसापुर्वी अशीच आग पिकळेवाडी येथील बागायतीला लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान मंगळवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास मेटावाडा-कुळे येथे लाग लागण्याचा प्रकार घडला. कुडचडे अग्निशामक दलाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. बुधवारी पहाटे पुन्हा नवावाडा येथे आग लागण्याचा प्रकार घडला. दुपारी कुत्रे कोंड येथील मळाला आग लागली. सर्व प्रकारात सरपंच गोविंद शिगांवकर व त्याच्या पंचमंडळाने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
सिद्धा डोंगर आगीचा भडका
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील सिद्धा डोंगरावर गेल्या तीन दिवसापासून आगीचा भडका उडाला असून संबंधित यंत्रणेने अजूनपर्यंत कोणतीच दखल न घेतल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली असून सिद्धा डोंगराच्या बाजूला बेंडला अभयारण्य असून अनेक जनावरांचा जीव धोक्यात येण्dयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे सिद्धा डोंगर हा धारबांदोडा तालुक्यातील प्रशासकीय इमारतीच्या जवळ आहे हे विशेष.
पेटके येथे काजु बागायतीला आग
याचबरोबर मंगळवारी आठ वाजण्याच्या सुमारास याच पंचायत क्षेत्रातील संजीवनी साखर कारखान्याजवळील पेटके येथील काजू बागायतीला आग लागण्याचा प्रकार घडला. सरपंच विनायक गावस यांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना केल्याने तसेच अग्निशामक दलाला पाचारण करून ही आग विझवण्यात मोठे यश मिळवले. मात्र सिद्धा डोंगरावर लागलेल्या आगीकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान साकोर्डा पंचायत क्षेत्रातील सुर्ला-धारगे येथील गुरूदास नार्वेकर यांच्या काजू बागायतीला मंगळवारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास वीज वाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार घडला. त्यात हजारों रूपयाच्या मालमत्तेची हानी झाली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाळपई व फोंडा अग्निशामक दलाला कल्पना देऊनही ते इतर ठिकाणी व्यस्त असल्याने पोचू शकत नसल्याचे कारण दिले आहे.
कोडली, कुळण, धावकोणात आग
विशेष म्हणजे चार पाच दिवसापुर्वी अशाप्रकारे कोडली तिस्क व धावकोण, शिरवळ, कुळण येथील काजू बागायतीला आग लागली होती व मोठे नुकसान सोसावे लागले. या एकंदरीत आग लागण्याच्या प्रकारामुळे हा प्रकार कुणी जाणूनबुजून मुद्दाम तर करीत नाही? का असा संशय घेतला जात असून त्याचा शोध घेणे महत्वाचे आहे. प्राप्त माहितीनुसार काही ठिकाणी लागलेली आग ही वीज वाहिन्यांच्या एकमेकांशी झालेल्या संपर्कामुळे शॉटसर्किट होऊन पडल्यामुळे आग लागल्याचे सिद्ध होत आहे. मात्र काही ठिकाणी लागलेल्या आगीबद्दल संशय घेण्यात जागा आहे असेही काहीचे मत आहे.
नावता डोंगरावरही पसरला वणवा
गोव्यातील डोंगर आणि जंगलांमध्ये पसरू लागलेला वणवा घोर चिंतेचा विषय ठरलेला असतानाच मंगळवारी रात्रीपासून कुठ्ठाळीतील नावता भागातही आगीच्या वणव्यामुळे चिंता पसरली आहे. तेथील डोंगरानेही पेट घेतलेला असून ही आग सांकवाळच्या पठारापर्यंत पोहोचलेली आहे. अग्निशामक दल, पोलीस, नौदल, वनविभाग, जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्थानिक आमदार अँथनी वास हे संकट दूर करण्यासाठी मंगळवारपासून व्यस्त आहेत.
कुठ्ठाळी मतदारसंघातील नावता कुठ्ठाळी हा भाग जंगलव्याप्त भाग असून या डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्तीही आहे. मंगळवारी सकाळी नावता कुठ्ठाळीतील डोंगरावर आग धुमसत असल्याचे काहींच्या नजरेस आले होते, मात्र, फारशी चर्चा झाली नाही. परंतु ही आग हळुहळु पसरत असल्याचे दिसू लागल्याने संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये चिंता पसरली. तेव्हाच स्थानिक आमदार अँथनी वास यांना ही माहिती मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनासह अग्निशामक दल, पोलीस, वन विभाग, नौदल अशा सर्वांना कुठ्ठाळीतील घटनेची माहिती देऊन सतर्क केले. त्यामुळे रात्री सारी यंत्रणा नावता कुठ्ठाळी भागात जमा झाली.
रात्र झाल्याने आली अडचण
रात्र असल्याने कुणालाही काहीही करणे शक्य झाले नाही. नौदलाने सकाळी घटनास्थळी येण्याचे आश्वासन दिले. तेथील दाट अंधारातून दूर डोंगरावर पेटत असलेली आग अस्पष्ट दिसत होती. ती पाहण्यावाचून पर्याय नव्हता. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक आमदार अँथनी वास पहाटे तीन वाजेपर्यंत लोकांसमवेत नावता कुठ्ठाळी भागात हजर होते.
दिवसभर वणवा रोखण्याचे प्रयत्न
काल बुधवारी दिवस उजाडताच या डोंगरावर पसरत असलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. जंगल असलेल्या या डोंगरावर प्रवेश करणे दाट झाडीमुळे अशक्यच ठरल्याने अग्निशामक दल तसेच बचावकार्यात सहभागी झालेल्यांना फारसे काही करणे शक्य झाले नाही. एका खासगी कंपनीनेही आपले पन्नास कामगार आग रोखण्याच्या कामासाठी दिले होते. मात्र, दाट झाडीत पाय ठेवणे त्यांनाही शक्य झाले नाही. मात्र, संधी मिळेल त्याप्रमाणे अग्निशामक दलाने आग विझवण्याचे प्रयत्न जारी ठेवले. वेर्णा, वास्कोतील शासकीय अग्निशामक दलाबरोबरच झुआरी कंपनीच्या अग्निशामक दलानेही आग रोखण्याच्या कामात सहकार्य केले. नौदलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काही वेळा पाण्याचे फवारे मारून पसरणारी आग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेष काही साध्य झाले नाही. नावता कुठ्ठाळीच्या डोगरावरील आग पसरत पसरत सांकवाळच्या पठारावरील मेटास्ट्रिप कंपनीपर्यंत पोहोचली. त्यामुळे तिथेही अग्निशामक दलाला धाव घ्यावी लागली. काही ठिकाणी आग रोखली गेली तरी बऱ्याच ठिकाणी आग पसरणे बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरूच होते.
स्थानिक आमदार अँथनी वास यांनी बुधवारी दिवसभर नावता गावात ठाण मांडले होते. डोंगरावरील प्रत्यक्ष जंगलातही त्यांनी पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिशांनी ही आग पसरत होती. साधारण दोन किलो मीटरच्या पट्ट्यात ही आग पसरत आहे. नावता डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती असल्याने ही आग घरांपर्यंत पोहोचण्याची भिती लोकांमध्ये आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्याची सज्जता अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मंडळाने ठेवली आहे.
रानांची आग विझविण्यासाठी जीवाचे रान! : मंत्री विश्वजित राणे यांची माहिती
राज्यात ठिकठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात जंगलांना आगी लागण्याचे सुरू असलेले प्रकार हे मानवी षडयंत्र हमखास नसून हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानाचे परिणाम आहेत, असा अंदाज वनमंत्री विश्वजित राणे यांनी वर्तविला आहे. त्याशिवाय आगीच्या घटनांचे साम्य पाहता ही आग नैसर्गिकच असल्याचे स्पष्ट होते असेही ते म्हणाले. तरीही याप्रकरणी मानवी हस्तक्षेप असल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही वन्यप्राण्याचा मृत्यू झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. बुधवारी विविध ठिकाणी जंगलांना लागलेल्या आगीची हवाई पाहणी केल्यानंतर सायंकाळी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पेटलेल्या रानांची आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान जीवाचे रान करत असून या आगीवर लवकरच नियंत्रण मिळविण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध ठिकाणी एकामागोमाग एक अशा आगीच्या घटना घडल्या असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली आहे. त्याशिवाय मदतकार्यासाठी नौदलाकडूनही अतिरिक्त हेलिकॉप्टर मागवले आहेत, असे राणे म्हणाले. मंत्र्यांनी पुढे सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पथके रात्रंदिवस काम करत आहेत. अग्निशामक दल पोहोचू शकत नाही, अशा घटनास्थळी सुमारे 30-35 कर्मचाऱ्यांचे पथक आगीशी झुंज देत आहेत. वनविभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
आगीच्या घटनामागील साम्य
बहुतेक आगीच्या घटनामागील साम्य म्हणजे त्या आगी आधी डोंगराच्या वरच्या भागात लागलेल्या असून वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे नंतर ती आग पसरत खाली आल्याचे दिसून आले आहे. यावरून प्रचंड वाढलेल्या तापमानामुळेच नैसर्गिकरित्या आग लागल्याचे स्पष्ट होत आहे, असे राणे म्हणाले. बुधवारी आपण काणकोणपासून वाळपईपर्यंतच्या अनेक भागातील आगीची हवाई पाहणी केली. त्यात म्हादई अभयारण्यातील साट्रे, देरोडे, करंजोळ, या भागातील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर अनमोड घाट, काले, धारबांदोडा, कोटार्ली सांगे, तसेच पर्रा भागातील खाजगी वन यासारख्या 18 भागातील आगी विझविण्यात यश मिळविले आहे असे त्यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे 797 जवान आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय स्थानिक शेकडो तऊणांनीही त्यांना मदत केली. या आगी विझविण्यासाठी अंदाजे 14 ते 16 टन पाण्याचा वापर करण्यात आला. यातील बहुतांश पाणी केरी धरणातून घेण्यात आले आहे.
सरंक्षणमंत्रालयाकडून मिळणार मदत
मोर्ले भागात वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे आग त्वरित फैलावत असून तिच्यावर नियंत्रण मिळविणे कठीण बनत आहे. त्यादृष्टीने ’फोग’ तसेच संरक्षणमंत्री, पीसीसीएफ, यांच्याकडे चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने अतिरिक्त हेलिकॉप्टर वापरण्यास परवानगी दिली आहे. हवाई दळ, नौदलासह कर्नाटकमधूनही अतिरिक्त हॅलिकॉप्टर्स मिळणार असल्याचे राणे यांनी सांगितले. म्हादई अभयारण्यास लागलेली आग नियंत्रणात येत असून साट्रे येथे दीपाजी गड, चरावणे, आदी भागातील आगही नियंत्रणात आहेत. चोर्ला भागात हॅलिकॉप्टर आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. चोर्लातील आग मोर्लेगड केरीपर्यंत पोहोचली आहे. तेथे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. ही आग फैलावू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने सभोवतालच्या भागात सुरक्षेचे उपाय आखले आहेत. अशाप्रकारे प्रत्येकी दहा जणांचा समावेश असलेले सुमारे 10 गट या भागात कार्यरत झाले असून अखंडित सेवा बजावत आहेत, असे त्यांनी सांगितले.
आग लावणाऱ्यांना अटक करणार
दरम्यान, राज्यात वन्यजीव संरक्षण कायद्याची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी होणार असून त्याअंतर्गत अभयारण्यात घुसताना वा आग लावताना कुणीही सापडल्यास त्याला त्वरित अटक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यापुढे अभयारण्य परिसरात कुणालाच प्रवेश देण्यात येणार नाही. जे कुणी मौजमजा, पार्ट्या वगैरे करण्यासाठी येतात, अशांना तर थाराच मिळणार नाही. अशा व्यक्तींवर वन कायद्याखाली कठोर कारवाई करावी, असे निर्देश आपण खात्याला दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. या कायद्याखाली अटक करण्यात आलेल्यांना मग कोणत्याही आमदार मंत्र्याचा वशीलासुद्धा वाचवू शकणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला. सध्या या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अभ्यास करण्यात येत असून लवकरच ती माहिती जाहीर करण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले.