10 मार्च रोजी मतमोजणी, निवडणूक आयोगाची घोषणा
प्रतिनिधी/ पणजी
निवडणूक आयोगाने गोव्याची निवडणूक जाहीर केली असून दि. 14 फेब्रुवारी रोजी गोव्यात मतदान होणार आहे. त्याद्वारे शनिवारी दुपारीपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. दि. 10 मार्च रोजी मतमोजणी सुरू होणार असून 21 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम नवी दिल्लीत पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आला. निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, विरोधी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड यांच्यासह अन्य सर्व पक्षांनी निवडणूक घोषणेचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर जनतेचा कौल आपणालाच मिळेल, असा दावाही प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
गोवा विधानसभेचा कार्यकाळ येत्या दि. 15 मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने निवडणूक आयोगातर्फे आज निवडणुकीची घोषणा करण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी गोव्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात सुरक्षित, शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, अधिकाधिक मतदारांनी त्या सहभाग घ्यावा यादृष्टीने आयोगातर्फे सर्व तयारी आणि उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दि. 21 ते 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. 29 रोजी अर्जांची छाननी होईल, दि. 31 रोजी अर्ज मागे घेता येतील व त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
2017 च्या निवडणुकीसाठी राज्यात 1642 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. यंदा ती संख्या 1722 एवढी वाढविण्यात आली आहे. या प्रत्येक केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह, शौचालय, विशेषांगीसाठी रॅम्प, यासह सेनिटाईझर, थर्मल स्पॅनर, मास्क, साबण यासारखी कोविड सुरक्षा व्यवस्थाही करण्यात येणार आहे. सुरक्षित मतदानासाठी मतदारांना हातमोजेही पुरविण्यात येणार आहेत. राज्यात केवळ एकच मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. राज्यात एकूण 9643 विशेषांगी मतदार आहेत.
या निवडणुकीत 5,62,500 पुरुष, 5,93,960 महिला व 4 तृतीयपंथी मिळून एकूण 11,56,464 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघाची सरासरी मतदारसंख्या 28912 एवढी आहे. त्यातील सर्वात कमी म्हणजे 19958 मतदार मुरगावात तर सर्वाधिक 35139 मतदार वास्को मतदारसंघात आहेत. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 44,772 मतदार वाढले असून त्यात 26297 नवमतदारांचा समावेश आहे. ही संख्या मतदारसंघवार सरासरी 1119 एवढी आहे, असे कुणाल यांनी सांगितले.
निवडणूक मुक्त वातावरणात व्हावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही जिह्यांसाठी फिरती पथके तैनात करण्यात येणार आहेत. कोणतीही माहिती किंवा तक्रारीसाठी 1950 ही मतदार हेल्पलाईन, व्होटर सर्व्हिस ऍप आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
प्रथमच ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करण्याची सुविधा
या निवडणुकीत प्रथमच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी मतदाराने स्थानिक बीएलओंच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करावी लागेल. निवडणुकीच्या दिवशी नियुक्त अधिकारी त्यांच्या घरी जाऊन व्हीडिओ रिकॉर्डिंगच्या माध्यमातून सुरक्षितरित्या मतदान करून घेतील.
त्याशिवाय विशेषांगी मतदारांवर खास लक्ष ठेवण्यात येणार असून अशा प्रत्येक मतदारास स्वतःचा हक्क बजावता यावा यासाठी आयोग पुढाकार घेणार आहे. याकामी बीएलओंचे सहकार्य फार बहुमूल्य ठरणार आहे, असे कुणाल यांनी सांगितले.
देशात 2019 मध्ये कोरोना महामारी आल्यानंतर त्यावरील लस निर्माण करण्यात भारताने यश मिळविले. त्या लसीचे दोन्ही डोस घेण्यात गोमंतकीय अग्रस्थानी राहिले. आतापर्यंत सुमारे 95.8 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत व आता लोक कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करत आहेत. त्या पार्श्वभूमिवर होणाऱया निवडणुकीसाठी मतदाराने दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याशिवाय निवडणुकीच्या या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांना दोन्ही डोस सक्तीचे असतील. या कर्मचाऱयांना ’फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून मान्यता देण्यात येईल आणि त्यांना अतिरिक्त बुस्टर डोसही देण्यात येईल, अशी माहिती कुणाल यांनी दिली.