तालुक्यातील युवक-युवतींचे तहसीलदारांना निवेदन
वार्ताहर / दोडामार्ग:
गोव्यातील विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या युवक-युवतींबाबत सद्यपरिस्थितीत तातडीने तोडगा काढण्याची मागणी तालुक्यातील बहुतांशी युवक-युवतींनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील असंख्य युवक-युवती हे गोव्यातील विविध कंपन्यांमध्ये मार्केटिंग तसेच अन्य पदावर कार्यरत होते. 22 मार्चपासून देशांतर्गत लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेक कंपन्या बंद झाल्या. त्यामध्ये गोव्यातील कंपन्यांचा देखील समावेश होता. अलिकडेच बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन शिथील झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या सीमा बंदीमुळे आम्हाला गोव्यात सुरू असलेल्या कंपन्यांच्या ठिकाणी कामावर जाता येत नाही. त्यामुळे अनेक युवक-युवतींसमोर बेकारीचा प्रश्न उभा राहिला आहे. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर दोडामार्ग तालुक्यात युवक-युवतींच्या बेकारीमध्ये वाढ होऊन त्यांच्या कुटुंबियांसमोर अनेक समस्या उभ्या राहतील. यासाठी आपण त्वरित लक्ष घालून गोव्यातील कंपन्यांमध्ये ये – जा करण्यासंदर्भातील कार्यवाहिच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे या निवेदनात युवक-युवतींनी म्हटले आहे.