सावंतवाडी, दोडामार्ग सीमाभागात प्रत्येकी दोन केंद्र : जिल्हाधिकाऱयांनी दिली मान्यता : ‘तरुण भारत’ने केला होता पाठपुरावा : सातार्डा केंद्रावर 96 विद्यार्थी देणार परीक्षा
मयुर चराटकर / बांदा:
‘कोरेना’च्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा गोवा बोर्डाकडून जाहीर करण्यात आल्या. यात 21 मे ते 1 जून या कालावधीत परीक्षा होणार आहेत. सद्यस्थितीत ‘कोरोना’मुळे गोव्यात प्रवेशासाठी कडक नियमावली करण्यात आल्याने गोव्यात शिक्षण घेणारे सीमेवरील विद्यार्थी व त्यांचे पालक चिंतेत होते. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत गोवा सरकारकडून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांबाबत वेगळा विचार करण्यात आला. गोव्यात दहावी-बारावीत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी सातार्डा, आयी, भेडशी व आरोंदा येथे केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतची चिंता दूर झाली आहे. उत्तर गोवा व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱयांनी याला मान्यता दिली असल्याची माहिती गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिली.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. गोवा ‘कोरोना’मुक्त झाल्यावर गोवा बोर्डाकडून 21 मेपासून परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. तर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, अलिकडील चार दिवसात गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या 30 च्या वर गेली आहे. त्यामुळे तेथे दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परीक्षा घेण्यास ‘हिरवा कंदिल’ दाखविला आहे. तर त्यासाठी विविध नियम व अटीसुद्धा घालण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रातून येणारे विद्यार्थी गोव्यातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी वेगळी केंद्र ठेवण्याची सूचनाही खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी दिली.
यात एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. ज्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतो, त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र असेल. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाईल. विद्यार्थ्यांची तपासणी व काळजी घेण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन आरोग्य कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत. आवश्यक ती इतर काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहेत.
गोवा बोर्डाकडून सिंधुदुर्गातून येणाऱया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय गोवा बोर्डाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी घेतला. तसे पत्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांना दिले आहे. यात सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱया विद्यार्थ्यांची परीक्षा सिंधुदुर्गातील केंद्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा महात्मा गांधी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल पेंद्रावर 96 विद्यार्थी, आरोंदा ग्रामोन्नती मंडळाच्या इमारतीमधील केंद्रात 11 विद्यार्थी, आयी येथील शाळेतील केंद्रात 24 विद्यार्थी, भेडशी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 61 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
‘तरुण भारत’ने वेधले होते लक्ष
गोवा बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर ‘तरुण भारत’ने ‘गोव्यात शिकणाऱया विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला’ या आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गोव्यात प्रवास करणे जिकिरीचे होते. त्यामुळे गोवा बोर्डाकडून त्यांची सोय करणे गरजेचे होते. त्यानुसार वृत्ताची दखल घेतल्याने दहावी-बारावीत शिक्षण घेणाऱया 192 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला.
परवानगीचे पत्र सादर
सीमावर्ती भागातून गोव्यात मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सीमाबंदी कायद्यामुळे गोव्यात इतर जिल्हय़ातील लोकांना प्रवेशबंदी आहे. या मुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. पत्रकार प्रवीण मांजरेकर व सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी याबाबत गोवा शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर गोवा शिक्षण मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून सिंधुदुर्गात या विद्यार्थ्यांची परीक्षा होण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी सहकार्य करण्याचे मान्य केल्यानंतर केंद्रे निश्चित करण्यात आली. याबाबत सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ व दोडामार्ग भाजप पदाधिकाऱयांकडूनही पाठपुरावा करण्यात आला होता.
दरम्यान, गोवा शिक्षण मंडळाने परवानगीसाठीचे दिलेले पत्र सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे सोमवारी सुपुर्द केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर प्रभू, योगेश गोवेकर, ओंकार नाडकर्णी उपस्थित होते. याबाबत संपूर्ण शाळा सॅनिटराईज करून योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना तहसीलदार म्हात्रे यांनी पारिपत्ये यांना दिल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना आपल्या ओळखपत्रासह मास्क, पाण्याची बाटली तसेच अन्य परीक्षा साहित्य घेऊन सकाळी 8.30 पर्यंत परीक्षा केदांवर उपस्थित राहण्याचे आवाहन गोवा शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.