साहित्यिक उत्तम कांबळे, बाविसाव्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ सातारा
ग्रंथ म्हणजे केवळ पुस्तकाच्या पानांवरची अक्षरांची गर्दी नाही, ग्रंथ माणसाला जगायला शिकवतात, भ्याड राजकीय व्यवस्था ग्रंथ व्यासंगाला घाबरते ती तुमच्या श्रद्धांवर बोलते पण तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही. माणसाच्या जगण्यातल्या दैनंदिन समस्या केवळ ग्रंथ व्यासंगाच्या जोरावर सोडवल्या जाऊ शकतात, असे कळकळीचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर शंकर सारडा नगरीमध्ये शुक्रवारी 22 व्या ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उत्तम कांबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, ग्रंथमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष साहेबराव होळ, उपाध्यक्ष विनायक लांडगे, समन्वय समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, सुनिता कदम इत्यादी यावेळी उपस्थित होते.
उत्तम कांबळे पुढे म्हणाले, सातारा ग्रंथ महोत्सव हा गेल्या दोन दशकांमध्ये मैलाचा दगड ठरला असून तो महाराष्ट्रातल्या सर्व ग्रंथ महोत्सवांना दिशादर्शक आहे. ग्रंथ म्हणजे केवळ पानांवर पुस्तकांची गर्दी नाही तर ग्रंथाच्या व्यासंगातून जगण्याचे सत्व आणि तत्व याला आकार मिळतो. ग्रंथ माणसाला जगायला शिकवतात नात्यांचा आणि भावभावनांचा विस्तार ग्रंथातून होतो. जो माणूस निसर्ग संस्कृतीत रमत होता तो माणूस ग्रंथ व्यासंगाने पारंपारिक संस्कृती तयार करून त्यामध्ये जगायला शिकला. जी राजकीय व्यवस्था मानवी समस्या सोडून धार्मिक भावना आणि श्रद्धांजली असते. मेंदू आणि मनगट कामाला लावू शकत नाही त्यामुळेच आजकाल महापुरुषांच्या भांडणाचा विषय हा कळीचा मुद्दा आहे.
मानवी समस्या आणि त्यांना भेदण्याची ताकद आणि वैचारिकता ही पुस्तकांच्या व्यासंगामधूनच येते. ग्रंथांमध्ये आणि शब्दांमध्ये जगण्या मारण्याचे भाव असतात म्हणून ग्रंथ हा जगण्याचा आणि सर्व भावनांचा खजिना आहे. मानवी संवेदना आणि दुःख टिपण्याचे काम साहित्यच करते म्हणून नेहमी कोणताही ग्रंथ हा परिपूर्णतेने वाचला गेला पाहिजे, असा आग्रह उत्तम कांबळे यांनी धरला.
ग्रंथसंपदा परंपरा आणि जगण्याचे भान देते-ज्ञानेश्वर खिलारी
ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, सोशल मीडियामुळे अर्धवट ज्ञानाचा धोका वाढला आहे. जगण्याची आणि संघर्षाचे दिवस मागे पडून जागतिकीकरणामुळे नवी व्यवस्था उदयाला येत असून येथील मानवी प्रश्न हे मूलभूत जगण्याची निगडित नाहीत. ग्रंथसंपदा आपल्या मूळ परंपरा आणि जगण्याचे भान देते त्यासाठी पुस्तके वाचली गेली पाहिजेत. ग्रंथमहोत्सव समितीने दोन दशकापूर्वी जो ज्ञान सत्संगाचा वसा घेतला आहे तो त्यांनी कायम ठेवला असून त्यातूनच उद्याचे साहित्य घडणार असल्याचे खिलारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या संघर्ष हेच सामर्थ्य आत्मचरित्रपर पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. सातारा ग्रंथ महोत्सव समितीने प्रकाशित केलेल्या ग्रंथ समीक्षा या पुस्तिकेचे सुद्धा यावेळी प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे यांनी ग्रंथ महोत्सवांच्या मागील वीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेत पुढील चार दिवसाच्या वाटचालीला वाचकांच्या गर्दीमुळेच बळ मिळणार आहे आणि उत्तम उत्तम पुस्तकांचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले.
सुनिता कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रंथमहोत्सव संयोजन समितीच्या वतीने उत्तम कांबळे आणि ज्ञानेश्वर खिलारी यांचे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.