कला दिग्दर्शक सुमित पाटील यांचा उपक्रम
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
वाचन संस्कृती टिकण्यासाठी मागील काही वर्षे सिंधुदुर्गमध्ये रमलेला एक युवक झटत आहे. गणेशोत्सवात पुस्तकांची सजावट करणे, वाचनाचे महत्व लोकांच्या मनावर ठसविणे आणि मग जमा झालेली पुस्तके गरजूंपर्यंत पोहोचवणे असा उपक्रम प्रसिद्ध कला दिग्दर्शक व श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमित पाटील या कलाकाराने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गमध्ये नेरुर येथील वर्धन कलामंच, परुळे जवळ जिव्हाळा वृद्धाश्रम, दोडामार्ग येथील निसर्गप्रेमी संजय सावंत अशा अनेकांपर्यंत तसेच पालघरमधील चार शाळा आणि आदीवासी पाडय़ावर वसई नायगाव जवळची गावे, वाशिम येथील आदिवासी पाडे, सांगली येथील ग्रंथालय अशा ठिकाणी सुमारे 35 हजारपेक्षा जास्त पुस्तकांचे वाटप ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पाटील म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ असा मंत्र सांगितला जातो ते उगीच नाही. बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही आहे. 2018 पासून पुस्तक चळवळीला सुरुवात झाली. वाचून झालेली पुस्तके दान करण्याच्या आमच्या या आवाहनाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. ज्या ठिकाणी वाचनाची आवड आहे, पण पुस्तके नाही अशा ठिकाणी जाऊन पुस्तके द्यायला सुरुवात केली. पुस्तक देवाण-घेवाणीची चळवळ विचारांना आणि बौद्धिक विकासाला चालना देणारी आहे. गणेशोत्सवात सुमारे 35 हजार पुस्तके मुंबईतून जमा झाली होती. या पुस्तकांची वर्गवारी करुन ती विविध भागात पोच करण्यात आली. यासाठी सुमित पाटील यांना सिनेअभिनेत्री छाया कदम, ऋतुजा बागवे यांचे सहकार्य लाभले. वाचनाचे महत्व समजावून सांगताना वाचलेले इतराना सांगण्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाच्या संकट काळातसुद्धा 30 हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवानंतर सुद्धा वाचकांकडून पुस्तके दान करण्यात येत होती. स्पर्धा परीक्षांबरोबरच महिलांचे आरोग्य लैंगिक शिक्षण यासंदर्भातील पुस्तकेसुद्धा दान करण्यात आली होती, हे विशेष असल्याचे सुमित सांगतात. आयुष्यात अनेक पिढय़ांचे ज्ञानसंचित केवळ वाचनामुळे प्राप्त होऊ शकते. पुस्तक चळवळीत सुमित यांच्या मित्र परिवाराचा मोठा सहभाग आहे. श्रीरंग संस्था, फॅन्ड्री फाऊंडेशन, पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, प्रवीण दाभोळकर यांचे सहकार्य लाभत आहे. पुस्तकांचा ज्ञानयज्ञ पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, फॅन्ड्री फाऊंडेशन या संस्थांच्या मदतीने यानंतरही सुरु राहणार असल्याचे सुमित यांनी सांगितले.