होम आयसोलेशन बंद – ग्रामपंचायत निधीतून खर्च करण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं असून त्यात सातारा जिल्हय़ाचाही समावेश आहे. मात्र, त्यामुळे आता ग्रामपंचायती, ग्राम दक्षता समित्यांची जबाबदारी वाढणार असून गावातच आवश्यकतेनुसार बेडचे विलगीकरण कक्ष सुरु करावे लागणार आहे.
ज्यांना काहीच लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत अशा तपासणीत बाधित अहवाल आलेल्यांना त्यांच्या घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय सुविधा असतील तर त्यांना 14 दिवसांच्या कालावधीसाठी होम आयसोलेट होण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी घरी सुविधा नसताना देखील त्याचा गैरफायदा घेतल्याने संसर्ग वाढल्याचे समोर येत आहे.
याबाबत आढावा घेत असताना राज्यातील 18 जिल्हे संसर्ग वाढल्याने रेड झोनमध्ये गेले आहेत. त्यामुळे या जिल्हय़ांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, त्यामुळे आता सरपंच, पाटील, तलाठी, ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत, ग्रामदक्षता समित्यांवरील जबाबदारी वाढणार आहे. कारण प्रत्येक गावात शौचालयांसह सुविधा बेडची सुविधा असलेले विलगीकरण कक्ष उभारावे लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने 25 टक्के शासन निधीतून खर्च करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हय़ात 1 हजार 719 गावे
जिल्हय़ात एकूण गावांची संख्या 1 हजार 719 आहे. ज्या ज्या गावात लक्षणे नसलेले रुग्ण असतील व त्यांना आता होम आयसोलेट होता येणार नाही. त्यासाठी ग्रामपंचायती व गावांना एकत्रित येवून गावातच आवश्यकतेनुसार बेड, शौचालय सुविधा असलेले विलगीकरण सेंटर उभारावे लागणार आहे. तिथे लक्षणे नसलेल्या बाधितांना त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ठेवावे लागणार असून अशा रुग्णांना त्यांच्या घरातील लोकांकडून जेवण देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
पहिल्या लाटेत जे केले तेच पुन्हा करायचेय
कोरोनाची पहिली लाट जिल्हय़ात आली ती आरंभी फार तीव्र नव्हती. मात्र, पुणे, मुंबईसह बाहेरील जिल्हय़ातून गावात येणाऱयांना 14 दिवस शाळेत विलग करुन ठेवण्यात येत होते. आताही तेच करायचे आहे. ज्यांचा अहवाल बाधित आलाय मात्र, त्यांना काही लक्षणे नाहीत. अशा रुग्णांना गावातच विलगीकरण कक्ष वा कोरोना सेंटर उभारुन तिथे ठेवायचे आहे. 14 दिवस कालावधीत त्यांची माहिती घेण्यासाठी आशा सेविका येणार आहे. त्यातील काही रुग्णांना आवश्यकता वाटल्यास मग कोरोना केअर सेंटर वा हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणार आहेत.
होम आयसोलेशनवर बंदी का?
राज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत होतं. मात्र, अनेक रुग्ण हातावर होम आयसोलेशनचा शिक्का असतानाही घराबाहेर पडत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचंही दिसून आलं आहे. तसेच या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. शिवाय हजारो लोकांच्या घरात शौचालय नाही, अनेकजण सिंगल रुमच्याच खोलीत राहत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने 18 जिह्यांमध्ये होम आयसोलेशनवर बंदी घातली आहे.
गावागावात उभारावे लागणार विलगीकरण कक्ष
लक्षणे नसलेल्या पण बाधित असलेल्या रुग्णांना त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. बेडसह शौचालये सुविधा निर्माण करुन द्याव्या लागणार आहेत. रुग्णाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तो गावातील इतर कोणाच्याही संपर्कात येवू नये म्हणून ग्रामदक्षता समित्यांना सतर्क रहावे लागणार आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता आता गावागावांनाच कोरोना हरवण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे.