जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह कंग्राळी खुर्द ग्रामस्थांनी केली मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना लसीसाठी ग्रामीण भागातील जनतेला प्रतीक्षेत थांबावे लागले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी जनता धावपळ करत आहे. मात्र, ग्रामीण भागातील जनतेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तातडीने ग्रामीण जनतेला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करावी, अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रामस्थांनी केली आहे.
मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन दिले आहे. आतापर्यंत कंग्राळी खुर्द गावातील केवळ 620 नागरिकांना लस देण्यात आली आहे. गावची लोकसंख्या 15 हजारांहून अधिक आहे. असे असताना पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा तातडीने लस उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.
कंग्राळी खुर्दबरोबरच आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, उचगाव, तुरमुरी, कुदेमनी, बाची, कोनेवाडी, बसुर्ते, अलतगा आणि इतर गावांतील नागरिकांना लस उपलब्ध करावी, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील जनता शेती करते. त्यांना वेळ कमी मिळतो. तेव्हा तातडीने लस उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एपीएमसी ते कंग्राळी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक वेळा यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. रास्तारोको केला आहे, तरीदेखील हा रस्ता अर्धवटच आहे. तेव्हा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना याबाबत सूचना करून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, महेश धामणेकर, यशोधन तुळसकर, परशराम मेंडके, मनोहर पाटील, गजानन पाटील, अमित हलकर्णीकर, महेंद्र पाटील, श्रीधर सप्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.