तालुका म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक या ध्येयासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत आहे. निवडणुका या सीमालढय़ाचा अविभाज्य भाग असून येत्या ग्राम पंचायत निवडणुकीत प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकविणे हे सीमावासियांचे आद्य कर्तव्य आहे. गट-तट न करता प्रत्येक ठिकाणी समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी साऱयांनी प्रयत्नशील राहूया, असा ठराव तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष म्हात्रू झंगरूचे होते.
प्रारंभी समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी प्रास्ताविक केले. निवडणुका कोणत्याही असोत, समितीच्या उमेदवारांचे ध्येय सत्ता मिळविणे आणि त्याचा उपभोग घेणे नसून अन्यायाने कर्नाटकात डांबलेला हा मराठी भाग महाराष्ट्राचा आहे. आमची संस्कृती-भाषा मराठी आहे, हे लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका जिंकून दाखवायचे असते. निवडणूक हा लढय़ाचा भाग असून प्रत्येक नागरिकाला या लढय़ामध्ये समितीच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करून भाग घेण्याची सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासन मराठी माणसांसमोर अनेक अडचणी आणत आहे. त्यावर मात करून समितीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अध्यक्ष म्हात्रू झंगरूचे यांनी केले. अर्ज करताना कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे. इंग्रजी अर्ज स्वीकारण्यास नकार मिळत आहे. मराठी भाषिकांची अडवणूक करून मराठी उमेदवारांची संख्या कमी करण्याचा डाव असल्याचे जि. पं. माजी सदस्य सुरेश डुकरे यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पंचायत माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर यांनी सांगितले.
यावेळी अशोक पाटील, पिराजी मुचंडीकर, शट्टुप्पा चव्हाण, सागर पाटील, पुंडलिक मोरे, नामदेव सांबरेकर, जोतिबा उचगावकर, बाळू इंगळे, कृष्णा पाटील, यल्लाप्पा जायाण्णाचे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.