ळ या वर्णाक्षराच्या वापरावरून झालेल्या चर्चेत आणि वादात विचारमंथन होऊन शेवटी नवनीतासारखं एक गाणं जन्माला आलं. ते म्हणजे
घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा
विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेल्या ह्या गाण्यात ळ चे वळसे इतक्मया वेळा आले आहेत की वादावर पडदाच पडला. त्यांनी ते वळसे आपल्या स्वर्गीय स्वरवलयांनी श्रीमंत केले आहेत. त्या गाण्याचं वैशिष्टय़ म्हणजे कान्हा, अर्थात ’श्रीकृष्ण’ हाच त्या गाण्याचा विषय आहे. खरं तर महाराष्ट्रात मुरलीधर कन्हैयापेक्षाही सुदर्शनधारी द्वारकाधीश जास्त आदराचे. त्यामुळे की काय
‘विराट ज्ञानी हा कोंदटला सुमनी’
किंवा
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा
अथवा
विमोह त्यागुन कर्मफलांचा, सिद्ध होइ पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणुन पुरुषार्था
यासारखी गाणी जास्त भावतात मराठी माणसाला. कृष्णाच्या बाललीला, रासलीला, गोपिकांचं भावविश्व, गोकुळ आणि वृंदावनची सृष्टी आणि एकुणात गोपजनांना परमप्रिय असणारा तो राधारमण, गोपिनाथ सर्वात जास्त वावरताना दिसतो तो उत्तर हिंदुस्थानात जन्मलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील चिजांमध्ये. कृष्णाचा उल्लेख संसाराच्या चाकोरीबाहेर असलेल्या विशुद्ध मोहाचा, प्रेमाचा आणि दैवी आनंदाचा कंद म्हणून त्याचं प्रतीक म्हणून केला जातो इथे. होरी, कजरी, विराणी, ठुमरी, ख्याल या सर्व प्रकारच्या बंदिशीमध्ये खूप मोठा भाग त्या परमात्म्याने व्यापलाय. क्मया जादू कर डाला दिवाने किये शाम, रटत श्याम श्याम श्याम, रंगी सारी चुनरिया रे पासून मधुरंजनी मधल्या ए री सखि आज, बिहागची कैसे सुख सोवे, पटदीपची’ ‘अरज सुनो मोरी शाम मनमोहन’ आणि वसंत, बहार आणि अशा कितीतरी रागांतल्या असंख्य चिजांची जादुई पोतडी एकदा उघडली की अवीट सुख देणारं धन म्हणजे काय ते अनुभवायला मिळतं. तो मुरलीधर श्याम संगीताचा उद्गाता आहे. स्वरेश्वर असणारा, लयभास्कर असणारा तो प्रतिभेचं सुखधाम आहे. त्याने ओठाशी धरून फुंकर घातली की बांबूच्या पोकळ नळीमधून साक्षात नादब्रह्म वाहू लागतं. त्याने प्रेमानं एक नजर फिरवली की गोपींच्या अंगांगांची वीणा होते. गाणं आणि कृष्ण यांचं काय अद्वैत आहे हे पूर्णांशाने आपल्याला कुणालाच कळलं नाहिये अजून.
ज्याला संगीताचा उद्गाता म्हणतात त्याला स्वतःला सुरात रमून राहणं किती प्रिय असेल! आपण सुरात कृष्णाला शोधतो. त्याच्या लीलांना मध्यवर्ती मानून आपण चिजा रचल्या, गाणी रचली, कीर्तन करतो, त्यावर गीतगोपालसारख्या संगीतिका जन्माला आल्या. त्याच कृष्णाला जन्मताक्षणी आईवडिलांचा विरह घडायचा होता. त्याच्या नशिबाचा चेहरा असा निपजला की त्याला जन्मदात्या आईने गुणगुणलेली अंगाई ऐकता आली नव्हती. ज्याने गोपगोपिकांना अमूप असा सहवास दिला, ज्या गोपबालकांना त्याने स्वतःच्या हाताने केलेला गोपाळकाला भरवला होता, ज्याच्या हातचं उष्टं खाण्यासाठी साक्षात देवदेवतांना कालिंदीच्या पाण्यात माशांचं रूप घेऊन वाट बघावी लागली होती त्याच कान्हय़ाला आपल्या प्रिय सवंगडय़ांचाही विरह घडायचा होता. ज्या बासरीवर गोपिका लोभल्या, जिच्या सुरांनी वेडी झालेली राधा कृष्णावर प्रेम करून धन्य धन्य झाली, तीच बासरी त्याला गोकुळ सोडल्यास परत काही हाती धरता आली नाही. संगीत हा आत्म्यामधला परमात्म्याचा अंश म्हणतात. पण साक्षात ‘परब्रम्ह निष्काम’ असलेल्या आणि ‘वाक्मया वाळे अंदु’ घालून नवनीत चोरणाऱया या देवाला आपल्या स्वतःच्या आत अगदी खोल असलेलं गाणंही कालिंदीच्या प्रवाहावरच सोडून द्यावं लागलं होतं. गायनप्रिय असलेल्या कोणत्याही माणसाला ‘आपल्याला जर गाणं सोडावं लागलं तर?’ या नुसत्या कल्पनेनेच काळजात धस्स होतं, मग मानवाच्या रूपात येणाऱया त्या देवाला तरी ही भावना चुकली असेल? त्याला नसेल का हो वाईट वाटलं? पण अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्याने आपलं विरह दुःख उरात गाडून टाकलं. अहं… त्यापेक्षा पाण्यात सोडलं म्हणावं. तेच दुःख, तेच सूर त्या यमुनेच्या तीरावर वाढलेल्या आणि त्याच पाण्यावर जन्माला आलेल्या उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात भिनून आजही वाहत आहेत. कृष्णाच्या विरहदुःखाचाच आशीर्वाद असावा तो. म्हणूनच की काय पण कृष्ण, गोकुळ, गोपिका, नंदयशोदा आणि सदैव त्याच्यात रमलेली राधिका हाच शास्त्रीय संगीतातील चिजांचा मूळ आधार राहिला आहे.
तशा त्याच्या आयुष्यात खूप स्त्रिया आल्या. आई म्हणून, सखी म्हणून, भगिनी, पत्नी म्हणून आणि पाल्य म्हणूनही. त्याची प्रेमिका, पत्नी असलेली रुक्मिणी आणि हट्टी सत्यभामा यांच्यातल्या सवतीमत्सरावरही अनेक गीते आहेत. ‘बहरला पारिजात दारी’ यासारखी. नरकासुराच्या कैदेतल्या त्या दुर्दैवी स्त्रियांचा तर तो पालनकर्ता या अर्थानेच ‘पति’ होता. यशोदेचे बाळ म्हणून आणि देवकीचे तान्हे म्हणून तो गाण्यात येतो तसा ‘हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल’ किंवा ‘राधे तुझा सैल अंबाडा’, ‘मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते’ पासून ‘वृंदावनी सारंग हा का लावी घोर जिवाला’ ‘मी राधिका मी प्रेमिका’ ते ‘राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा’ पर्यंत राधारमण म्हणून येतो. राधा म्हणजे त्याच्या आयुष्यातलं गोड गुपित, राधा म्हणजे त्याची बासरी, त्याचं गाणं! हाच कृष्ण द्रौपदीचा सखा होतो. त्याला ‘द्रौपदीसी बंधु शोभे नारायण’ असं जरी म्हटलं तरी इथे बंधु या शब्दाचा अर्थ भाऊ असा नसून जो स्नेहाने बंदिस्त केला आहे तो बंधु अर्थात सखा असा होतो. स्त्रीला ‘सखा’ असणं ही संकल्पना आपल्या समाजाला आजही रुचत नाही त्यामुळे रुढ नात्याची ही अवगुंठनं घेऊन प्रेमाच्या हक्काचा हा प्रकार वावरतो. बासरी सोडून सुदर्शन हातात घेतल्यापासून त्याने गाणं जे बाजूला ठेवलं ते ठेवलंच शेवटपर्यंत. त्याचा विरह त्याला कधी छळत असेल? शेवटच्या क्षणी त्याला काय आठवलं असेल? राधा? की बासरी?
अपर्णा परांजपे-प्रभु