वार्ताहर/ लोटे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कृषी रसायन निर्मिती करणाऱया घरडा केमिकल लिमिटेड कंपनीच्या बी-7 नंबरच्या प्लॅन्टमधील रिऍक्टरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर बी-7 नंबरच्या प्लॅन्टमधील उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर प्रदूषण मंडळाने दिले आहेत. दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झालेली असतानाही औद्योगिक सुरक्षा विभाग व प्रदूषण मंडळाचे कोणीच अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल न झाल्याने लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
कोल्हापूर येथील औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक जोशी व उपसंचालक दोरूगडे यांना शनिवारी सकाळी 9 वाजता घरडा कंपनी व्यवस्थापनाने दूरध्वनीद्वारे दुर्घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर ते कोल्हापूर येथून दुपारी 2 च्या सुमारास लेटेतील घरडा कंपनीत दाखल झाले. दाखल झाल्यावर बी- 7 प्लॅन्टची पाहणी करून दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेतली. ज्या रिऍक्टरमधून घटना घडली, त्या रिऍक्टरमध्ये मॅन्युअल ओपन असल्याने मटेरियलमधून गरम वाफा बाहेर येत होत्या.
सोडियम हायड्राईड ही पावडर टाकण्यासाठी मेनव्हॉल्व ओपन ठवावे लागते. त्यामुळे त्यातून गरम वाफा येऊ शकतात, परंतु प्राथमिक अहवालात बंद रूममध्ये उत्पादन प्रक्रिया रिऍक्टरमध्ये करावी लागले. त्यामुळे रिऍक्टर तापला नसून इलेक्ट्रीक शार्टसर्किटचा अंदाज औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक दारूगडे यांनी वर्तवला आहे. दरम्यान, प्रदूषण मंडळाचे चिपळूण येथील अधिकारी चव्हाण यांनी खुलासा करताना म्हटले की, नाशिक येथे पुतण्याचे निधन झाल्याने व वडील आजारी असल्याने 19 मार्च रोजी रात्री चिपळूण येथून नाशिकला निघालो. 20 रोजी सकाळी पोहोचलो असता 9 वा. मला कंपनीतील दुर्घटनेबाबत फोन आला. रत्नागिरी येथील प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांना तातडीने माहिती देऊन त्या ठिकाणी जावून पाहणी करण्यास सांगितले. मात्र ते रत्नागिरी येथे एमपीएससी परीक्षेसाठी डय़ुटीवर असल्याने त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱयांना विनंती करून दुपारी 1 वा. परवानगी मिळवत लोटे येथील घटनास्थळी 3 वा. पोहोचले. लाटे यांनी पाहणी केली असता या घटनेबाबत जोपर्यंत औद्योगिक सुरक्षा विभागाचा पाहणी अहवाल व त्यांनी दाखवलेल्या त्रुटी यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत घरडा कंपनीचा बी-7 प्लॅन्ट उत्पादन बंदचे आदेश प्रदूषण मंडळ कोल्हापूरचे ऑफिसर रवींद्र आंधळे यांनी दिल्याचे सांगितले. यामुळे अहवाल प्राप्तीकडेच साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.