प्रतिनिधी / बेंगळूर
ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाची लक्षणे असणाऱया प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे. याबाबत महसूल खात्याचे प्रधान कार्यदर्शी मंजुनाथ प्रसाद पत्रक प्रसिद्ध करतील, अशी माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली.
ग्रामीण भागात संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही तो नियंत्रणात आलेला नाही. लोक कोरोना चाचणी करून घेण्यासही टाळाटाळ करीत आहेत. तसेच चाचणी केंद्रांची संख्या जास्त नाही. त्यामुळे डॉक्टर, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्त्या घरोघरी जाऊन चाचणी करणार आहेत. सदर पथक बाधितांचा शोध घेऊन घटनास्थळीच रॅपिड अँटिजेन टेस्ट करेल. त्यामुळे बाधितांचा शोध घेण्यास मदत होणार असून बाधित रुग्णावर घरीच उपचार करावेत की रुग्णालयात याबाबत डॉक्टर निर्णय घेतील. याचबरोबर बाधिताच्या प्राथमिक संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातील. तसेच त्यांना वैद्यकीय किटही दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीच आम्ही मोबाइल क्लिनिकद्वारे खेडय़ांना भेट दिली आहे. अंतिम वर्षात शिकत असलेले वैद्यकीय, बीएससी नर्सिंग आणि बीडीएस विद्यार्थ्यांचा यासाठी उपयोग करून घेतला जात आहे, असेही ते म्हणाले.