वार्ताहर/ शिखर शिंगणापूर
कोरोनाच्या महामारीचा सामना करण्यासाठी संपूर्ण भारत देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिह्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन सुरू होऊन एक ते दिड महिने होऊन गेला आहे. प्रसूतीसाठी महिलांची तर ह्रदयविकार रुग्णांची घाटमाथा मुख्यरस्त्याच्या खुदाईमुळे गैरसोय होत आहे, किमान वैद्यकीय सेवेसाठी तरी मुख्यरस्ते खुले करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा अंतर्गत आरोग्य सेवा नागरिकांना लवकर मिळण्यासाठी अडचण जाणून घेतल्या जात आहेत. शिंगणापूर, मोही, मार्डी, थदा ळे, सोकासन, डंगिरेवाडी ही गावे सातारा शहरापासून 80 ते 90 किमी अंतरावर आहेत. हृदयविकार, शुगर, जखमी, गंभीर आजार असणाऱया रूग्णांना कमी अंतरावर व लवकर उपचार मिळण्यासाठी सातारा जिह्यातील फलटण या एकमेव ठिकाणी आहे. त्यामुळे सोकासन, मोही, खुटबाव, सोकासन, शिंगणापूर, थदाळे, डंगिरेवाडी गावांना वेळेत उपचार घेता येत होतो.
मात्र जिल्हा सिमा बंदीमुळे शिंगणापूर-फलटण रस्ता कोथळे घाट बंद केल्याने वैद्यकीय सेवा मिळणे बंद झाल्याने उपचार अभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. कोथळे हे गाव सोलापूर जिह्याच्या हद्दीत असून शिंगणापूरहून फलटणला जाण्याचा एकमेव मार्ग हा कोथळे घाट आहे. कोथळे घाटातील मुख्य रस्ता उकरून टाकला असल्याने फलटण जि.सातारा या ठिकाणी पेंशट जाऊ शकत नाहीत. गंभीर अवस्थेतील रूग्ण, गर्भवती महिला, जखमी, मणक्याचे विकार, हृदयविकाराचा त्रास असणाऱया व्यक्तीसह इतर रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी फलटणलाच जावे लागते. सुमारे 30 ते 40 मिनिटांत पोहचून उपचार घेता आल्याने जीव वाचला जाऊ शकतो. याकरिता सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोथळे (ता.माळशिरस) या गावामध्ये चेक पोष्ट उभारून कोथळे घाट फलटणला जाण्यासाठी खुला करण्यात यावा.
तसेच सातारा जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी शिंगणापूर-फलटण कोथळे घाट मार्ग खुला करून गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.