प्रतिनिधी / इचलकरंजी
गेल्या बारा वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांनी पदवीधरांचे प्रश्न का सोडवले नाहीत. त्यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ झाली. त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. चंद्रकांतदादांचे पायगुणच असे आहे की, जिथे जातील तिथे कार्यक्रम होतो, असा टोलाही त्यांनी लगावला. येथील तोष्णीवाल गार्डनमध्ये पूणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे अनुक्रमे उमेदवार अरुण लाड व प्रा. जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे. शिक्षक मतदार संघातून कोल्हापूर जिल्ह्याला आमदार होण्याचा पहिल्यांचा मान मिळणार आहे, त्यामुळे प्रा. जयंत आसगांवकर यांना निवडून देवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन चांगले काम केले आहे. पण त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण अधिकार्यांचे अधिकार कमी करण्याची गरज आहे. शिवसेनेचा भक्कम पाठिंबा असल्याने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शिल्पकार हा कोल्हापूर जिल्हा असणार आहे.
प्रा. आसगांवकर यांनी शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून विरोधकांच्या बुध्दीभेद आणि भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन केले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, मदन कारंडे, महादेव गौड, बाबा पाटील, वि. ह. सपाटे, दादासाहेब लाड, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. स्वागत पी. डी. शिंदे यांनी तर प्रास्ताविक अशोक हुबळे यांनी केले. व्यासपिठावर रविंद्र माने, राहूल खंजीरे, संजय कांबळे, नितीन जांभळे, मुरलीधर जाधव, शेखर शहा आदि उपस्थीत होते.