प्रतिनिधी / सातारा :
चतुर्थश्रेणी संवर्गातील काही कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करून फरकासह वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत पदोन्नतीचा निर्णय तात्काळ घ्यावा, अनुकंपा वरील चालू वर्षातील नेमणुका तात्काळ करण्यात याव्या, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी संघटनेस सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या गोष्टीला एक महिना होवून गेला. मात्र, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मागण्या सोडवण्यास टाळाटाळच केली आहे. त्यासाठी दि. 24 ऑगस्ट रोजी एक दिवसांचे धरणे आंदोलन करुन 30 रोजीपासून संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.
सोमवारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण, कार्याध्यक्ष विष्णू नलवडे, खजिनदार चंद्रकांत जाधव, सरचिटणीस प्रकाश घाडगे यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवून तातडीने न्याय न दिल्यास हे आंदोलन असेच सुरु राहील, असे सुरेखा चव्हाण यांनी सांगितले.