एसटी संपामुळे परतीच्या प्रवासात कुचंबणा : चिपळूण आगारातून रविवारी बसेस होणार रवाना
चिपळूण : शिमगोत्सवासाठी आलेले चाकरमानी परताला निघाले असताना एस.टी. संपामुळे त्यांची अडचण होत आहे. मात्र चिपळूण आगाराने सांगली, कोल्हापूर आगारांची मदत घेतली असून तेथील 20 बसेस येथील आगारात आणून त्या रविवारी चाकरमान्यांना घेऊन मुंबई, पुणेच्या दिशेने रवाना होणार आहेत.
कोकणातील शिमगोत्सवानिमित्त बहुसंख्य चाकरमानी मिळेल त्या वाहनाने रविवारी गावी दाखल झाले. शिमगोत्सवाची सांगता झाल्याने चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. या प्रवासाची समस्या सोडवण्यासाठी आगार प्रशासनाने कोल्हापूर, सांगली या दोन आगारांकडून 20 बसगाडय़ा चिपळूण आगारात दाखल होणार आहेत. त्या बसेस रविवारी मुंबई, पुणेच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली आहे.