प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झालेला नसल्याने गावपातळीवरील बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कार्यवाही सुरु आहे. परिणामी दिवसाला 5 ते 7 हजाराच्या दरम्यान चाचण्या होऊ लागल्यामुळे जिह्यातील अनेक गावे कोरोनामुक्त होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे सध्या जिह्यातील 849 गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. प्रशासनस्तरावर उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे आहे. त्यासाठी गावोगावी कोरोना चाचण्या हाती घेण्यात आल्या. त्यामुळे गेल्या महिन्याभरात चाचण्यांच्या संख्येत वाढ झाले. जिह्यात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात 1 हजारहून अधिक गावे कोरोनामुक्त होती. या 15 दिवसात त्यात घट झाली आहे.
जिल्हय़ात अजूनही कोरोनाबाधितांच्या वाढीला म्हणावा तसा ब्रेक लागलेला नाही. एकच बाधित सापडणाऱया गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजापूर तालुक्यात पंधरापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांची संख्या सर्वाधिक 103 आहे. त्या पाठोपाठ चिपळूण, खेड, दापोली आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो. 25 पेक्षा अधिक बाधित असलेली गावे मोजकीच आहेत. लांजा, खेड आणि मंडणगड तालुक्यात उद्रेकजन्य स्थिती असलेली गावे कमी आहेत. जिल्हा प्रशासनाने अधिक बाधित असलेली गावे उद्रेकजन्य म्हणून घोषित करुन तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित क्षेत्रात घट करण्यात जिल्हा आरोग्य विभागाला शक्य झाले आहे.