प्रतिनिधी/ चिकोडी
अथणी, निपाणी, संकेश्वर येथे चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच चोरटय़ांनी शनिवारी रात्री चिकोडी शहरातील मध्यभाग म्हणून ओळखल्या जाणाऱया के. सी. रोडवरील सहा दुकाने फोडली. चोरटय़ांनी रोख रकमेवर डल्ला मारल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे शहरवासीयांतून भीती व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्हय़ात चोरटे फोफावले असल्याचे वाढत्या चोरीच्या घटनावरुन दिसून येते. याची दखल घेत चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, शहरातील के. सी. रोडवर असलेल्या न्यू लक्ष्मी बेकरी रॉयल टेडर्स, कृष्णा फुटवेअर, अलंकार स्टेशनरी, लक्ष्मी बेकरी व जय हनुमान हॉटेल अशा सहा ठिकाणी छपरावरील पत्रे काढून चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. यानंतर येथील रोकड लंपास केली. न्यू लक्ष्मी बेकरीतील 500 रुपये, रॉयल टेडर्स दुकानातील 2500 रुपये, कृष्णा फुटवेअरमधील 600 रुपये व दोनजोड बुट, लक्ष्मी बेकरीतील 500 रुपये तर जय हनुमान हॉटेलमधीलही रक्कम चोरटय़ांनी लंपास केली. चोरटय़ांच्या हाती मोठी रक्कम लागली नसली तरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सहा दुकाने रात्रीत फोडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानकाबाहेर प्रकरणे मिटवत असल्याचा आरोप
या घटनेविषयी चिकोडी पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. पण घटनेची नोंद घेण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ झाल्याने शहरवासींयातून संताप व्यक्त होत आहे. पोलीस सर्व प्रकरणे पोलीस स्थानकाबाहेरच मिटवत असल्याचा आरोप नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
चोरटय़ांकडून महत्त्वाची शहरे टार्गेट
अथणी, निपाणी, संकेश्वर पाठोपाठ आता चिकोडीत चोरीची घटना घडल्याने चोरटय़ांची एक टोळी कार्यरत असून ही टोळी चिकोडी उपविभागातील महत्त्वाच्या शहरांनाच टार्गेट करत आहे. चोरटय़ांनी ज्या दुकानाचे छत कौलारू अथवा पत्र्याचे आहे अशाच दुकानांना लक्ष्य केले. पोलिसांनी लवकरात लवकर चोरटय़ांच्या मुसक्मया आवळाव्यात, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.