संरक्षण मंत्रालयाच्या आढाव्याचा निष्कर्ष : पँगोग सरोवराच्या मोक्याच्या स्थानांवर भारताचा ताबा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सैनिकांच्या विरोधात अपारंपरिक शस्त्रांचा वापर केल्याने तसेच सीमेनजीक मोठय़ा प्रमाणात सैनिक तैनात केल्यानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या आढाव्याच्या निष्कर्षांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाने अपारंपरिक शस्त्रांचा तपशील दिलेला नसला तरीही चिनी सैनिकांनी दगड, लोखंडी सळी, खिळय़ांनी युक्त रॉडचा पँगोंग सरोवर तसेच गलवान खोऱयात भारतीयांच्या विरोधात वापर केल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. संबंधित क्षेत्रातील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यानेच भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आहे.
चिनी आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला वायुदलाने मदत केली आहे. सैनिकांची ये-जा, तोफा, रणगाडे तसेच दारूगोळा यांची संबंधित परिस्थितीत योग्यप्रकारे वाहतूक हाताळण्यात आली आहे. रस्ते, निवाससुविधा तसेच पूल यांची जलदगतीने निर्मिती करत सैन्याच्या तैनातीला बळ पुरविण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या 1 जानेवारी रोजी प्रकाशित आढावा अहवालात म्हटले गेले आहे.
चीनने एकतर्फी तसेच चिथावणीखोर कृत्यांद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या सैन्याने तणाव वाढविणाऱया हालचाली केल्या असतानाही भारतीय सैन्याने द्विपक्षीय करार तसेच शिष्टाचारांचे पालन केल्याचे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.
15 जून रोजी गलवान खोऱयातील हिंसक झटापटीत चीनला मोठी हानी पत्करावी लागल्याचे आढाव्यातून स्पष्ट होते. पँगोंग सरोवराच्या दक्षिण काठावरील उंच ठिकाणी भारतीय सैन्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थानी नियंत्रण मिळविले आहे. चिनी विस्तारवादाच्या प्रयत्नांना रोखत भारतीय सैन्याने प्रतिकूल हवामानातही महत्त्वाचे यश मिळविले आहे. हिवाळय़ाकरता आवश्यक तयारी करत चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज असल्याचे म्हटले गेले आहे.
वायुदलाची हेवी-लिफ्ट विमाने लडाख क्षेत्रात अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. युद्धसामग्रीसह सैनिकांच्या जलद तैनातीत या विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय हद्दीत चिनी सैनिक दाखल होण्यापूर्वीच भारतीय सैन्याने जलद पावले टाकत महत्त्वाच्या तसेच उंचीवरील ठिकाणांवर ताबा मिळविला आहे. पँगोंग सरोवर काठावर भारत आता अत्यंत मोक्याच्या ठिकाणी पोहोचला असून तेथून चिनी सैन्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवता येणार आहे. चिनी सैनिकांच्या तैनातीपासून काही मीटर अंतरापर्यंत ताबा मिळविला आहे. कुठल्याही घडामोडींसाठी भारतीय सैन्याने तयारी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.