नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रकल्पातील एका भुयारी मार्गाचे कंत्राट चिनी कंपनीला दिल्याने केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड सुरू झाली आहे. काँग्रेसबरोबरच ‘आरएसएस’शी जवळीक असलेल्या स्वदेशी जागरण मंच या संघटनेनेही याप्रश्नी शंका उपस्थित केली आहे. ‘चीनचा सन्मान, शेतकऱयांचा अपमान, विसरणार नाही हिंदुस्तान’ अशा आशयाचे ट्विट काँग्रेसने केले आहे. मात्र, सरकारने आतापर्यंत याबाबत कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र, लडाखमधील सैन्य संघर्षामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच हे कंत्राट चिनी कंपनीला देण्यावरुन आता ‘राजकीय वादळ’ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
न्यू अशोकनगर ते शाहिदाबाद मार्गावर जमिनीखालून जाणारा 5.6 किमीचा मार्ग तयार करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने (एनसीआरटीसी) शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला हे कंत्राट दिले आहे. एनसीआरटीसी देशातील पहिली रिजनल रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारत आहे. यावेळी त्यांनी चिनी कंपनीला कंत्राट देताना संपूर्ण प्रक्रिया आणि नियमांचे पालन केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर कंपनीला कंत्राट देण्यापूर्वी वेगवेगळय़ा स्तरावरुन परवानगी घेण्यात आली आहे. या कंपनीला दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडोअरच्या सर्व नागरी कामांचे कंत्राट देण्यात आले असून वेळेत काम पूर्ण होईल अशा वेगाने बांधकाम सुरु आहे,’’ अशी माहिती एनसीआरटीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे. गतवषी जून महिन्यात शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली सर्वात कमी असल्याचे समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला होता.