वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलला मंगळवारी देशभरातून चाहत्यांच्या तीव्र निषेधाला सामोरे जावे लागले. यावर्षीची आयपीएल संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार असून विवो या चायनीज मोबाईल कंपनीला प्रमुख पुरस्कर्ते म्हणून कायम ठेवल्याबद्दल चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
भारत व चीन यांच्यात अलीकडेच लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात चीनविरोधी संतापाची तीव्र लाट पसरली असून चिनी वस्तू, ऍप्स, मोबाईल या सर्वांवर बहिष्कार घालण्याचे सत्र सुरू झाले आहे. आयपीएलदेखील देशवासियांची भावना लक्षात घेऊन विवो कंपनीला प्रमुख पुरस्कर्ते म्हणून बाजूला करतील, अशी अपेक्षा केली जात होती. त्या संदर्भात विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. पण रविवारी झालेल्या आयपीएल जीसीच्या बैठकीत तसा कोणताही निर्णय घेतला गेला नाही, आणि विवोलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जनतेत क्षोभ उसळला आहे. एका राष्ट्रवादी समूहाने तर आयपीएलवरच बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने, ज्याचे 70 दशलक्ष छोटे व्यावसायिक सदस्य आहेत, जनतेच्या भावनांची अजिबात कदर न करणाऱया आयपीएल स्पर्धेलाच सरकारने ब्लॉक करावे, अशी मागणी केली आहे तर चायनीज पुरस्कर्त्यांना हटविले गेले नाही तर आयपीएलवरच बहिष्कार घालावा, असे स्वदेशी जागरण मंचने आवाहन केले आहे. या निर्णयाचा आयपीएल आयोजकांनी फेरविचार करण्याची सूचनाही त्यांनी केली असून देशाभिमान आणि देशाची सुरक्षितता याला सर्वाधिक प्राधान्य देण्याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
या आक्रमणानंतर आयपीएलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी प्रायोजक बदलणे ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. विरोधी पक्षातील काही राजकारण्यांनी, चिनी पुरस्कर्ते कायम ठेवण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. या स्पर्धेतून भरपूर महसूल मिळत असल्यानेच हा निर्णय घेतला गेला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
विवो आयपीएल लीगमधून बाहेर पडणार?
चिनी कंपनीचे प्रायोजकत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या लोकक्षोभाचा परिणाम होण्याची चिन्हे दिसत असून विवो इंडिया लवकरच या लीगमधून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त अरब अमिरातमधील स्पर्धा प्रेक्षकाविना खेळवली जाणार असल्याने आयपीएल प्रँचायजींना तिकीटविक्रीतून मिळणाऱया उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. पण आता प्रँचायजींनीच हा विषय लावून धरला असून जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन विवो लीगमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी इतर प्रँचायजींना कळविले आहे. प्रँचायजीच्या या कृतीवर बीसीसीआयनेही नाराजी व्यक्त केली असून स्वतःहून निर्णय घेण्याआधी प्रँचायजीनी आपल्याशी चर्चा करायला हवी होती, असे मंडळातील एका सदस्याने सांगितले. मंडळ यावर भविष्यात विचार करणारच आहे. पण आता विवोने माघारीचा निर्णय घेतलाच तर दुसरा पुरस्कर्ता शोधणे ही बीसीसीआयसमोरील मोठी अडचण ठरणार आहे. येत्या 24 तासात या संदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा असून प्रँचायजींना मात्र भरपाईची चिंता लागून राहिली आहे.