प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण तालुक्यातील निसर्गप्रेमी एकत्र येऊन वणवा मुक्त कोकण समिती तयार करण्यात आली आहे. यासाठी प्रारंभी तालुक्यातील सोळा गावांमध्ये जनजागृती सुरू झाली असून सोमवारी पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. गावागावांत कार्यशाळा आयोजित करण्याबरोबरच कृतीदल स्थापन करण्याचेही ठरवण्यात आले.
कोकणात सर्वत्र उन्हाळय़ामध्ये वणवे लावले जात असल्याने त्यामध्ये मोठय़ाप्रमाणात पक्षी, प्राणी, वनस्पती जळून नष्ट होत आहेत. बागायतीचेही मोठे नुकसान होत असल्याने पर्यावरणाचीही हानी होत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या सभेत वणवा मुक्त कोकणबाबत ठोस शासकीय कार्यक्रम हाती घेण्याबाबत मुख्यमंत्री, पर्यावरण तसेच वनमंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन वणवा मुक्त कोकण समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून 160 गावांत पत्रे पाठवून जनजागृतीला सुरूवात करण्यात आली आहे.
सोमवारी पंचायत समितीमध्ये सभापती धनश्री शिंदे, उपसभापती पांडूरंग माळी यांच्या उपस्थितीत समितीचे पदाधिकारी शौकत मुकादम, श्रीराम रेडीज, भाऊ काटदरे, नीलेश बापट, पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे, बाबू साळवी, राजू जाधव, कृषी विस्तार अधिकारी सुनील गावडे, अमोल पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत वणवे रोखण्यासाठी तंटामुक्तीच्या धर्तीवर गावांत कृती दल स्थापन्याबाबत चर्चा करण्यात आली.
तालुक्यात प्रारंभी खेर्डी, टेरव, कळंबस्ते, धमणवणे, कापसाळ, कामथे, कळवंडे, धामणदेवी, पेढे, परशुराम, मिरजोळी, वालोपे, शिरळ, भागाडी, पाचाड, कालुस्ते या सोळा गावांत मोठय़ाप्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. वरील गावांत प्रत्यक्ष फिरून वणव्याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. तसेच गावात लोकांना भेटून पत्रके वाटली जात आहेत. या गावांत पंचायत समिती स्तरावरूनही पत्रव्यवहार करण्याचे ठरले. गावात कार्यशाळा घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली.