संयमाचा बांध फुटला, कुंभार्ली, कशेडीत ‘ऑनलाईन’ नोंद, चालत येणाऱया प्रवाशांसाठी चेकपोस्टवरून बसची व्यवस्था
वार्ताहर/ चिपळूण
लॉकडाऊन काळात दहा बाय दहाच्या जागेत घुटमळणाऱया मुंबई, पुणेतील चाकरमान्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे. या चाकरमान्यांनी मिळेल त्या वाहनांबरोबरच पायी चालत गावाकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे दिवसागणिक त्यांची संख्या वाढू लागली असून दोन दिवसांत हजारों चाकरमानी तालुक्यात दाखल झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
गेले दोन महिने तालुक्यातील विविध गावांतील चाकरमानी मुंबई, पुणे शहरांमध्ये अडकून आहेत. लॉकडाउन उठेल या आशेवर ते एक-एक दिवस ढकलत होते. मात्र गाठीला असणारा पैसा संपल्याने आणि त्यातच हाताला काम नसल्याने खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. त्यातच बहुतांशी चाकरमानी भाडेतत्वावर रहात असल्याने मालकांना भाडय़ाचे पैसे कुठून द्यायचे? या पेचातही अनेकजण पडले आहेत. कोरोनाची भीती, पैशांचा अभाव आणि त्यातच उपासमारीची वेळ अशा संकटात सापडलेल्या चाकरमान्यांनी पुढे-मागे न पाहता थेट गावाकडची वाट धरण्यास सुरूवात केली आहे.
आपली मुले-बाळे आणि पत्नी, आई-वडिलांसह शक्य होईल तेवढे सामान घेऊन हे चाकरमानी गावात परतू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत हजारांहून अधिक चाकरमानी चिपळुणात दाखल झाले आहेत. गुरूवारी 661, तर शुक्रवारी सकाळी 250हून अधिक लोकांचा त्यामध्ये समावेश होता. चाकरमान्यांचा गावाकडील प्रवास सुरूच आहे. प्रशासनामार्फत त्यांचे कंटेन्टमेंट व नॉन कंटेन्टमेंट झोननुसार विलगीकरण केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी, तर चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटामध्ये चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. चाकरमान्यांच्या नोंदणी कामात सुसूत्रता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या दोन्ही ठिकाणांबरोबरच तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांना त्यासंदर्भात एक लिंक दिली आहे. त्यानुसार या चेकपोस्टवर चाकरमान्यांची ऑनलाईन पध्दतीने डाटा इंन्ट्रीच्या माध्यमातून नोंद केली जात आहे. येणाऱया चाकरमान्यांची संख्या किती? ते कोणत्या तालुक्यातील आहेत? त्यांनी आपल्या तालुक्यातील प्रशासनाकडे आल्याची नोंद केली आहे का? कोणी तेथून थेट घरी तर गेले नाही ना? याची माहिती त्या लिंकद्वारे प्रत्येक तालुका प्रशासनाला मिळत आहे. याशिवाय पायी चालत येणाऱया पुणे येथील चाकरमान्यांसाठी कुंभार्ली चेकपोस्टपासून चिपळूणपर्यंत येण्यासाठी प्रशासनाने बसची व्यवस्था केली आहे.
उत्तम नियोजनाबद्दल प्रशासनाचे विशेष कौतुक
कोरोना पार्श्वभूमीवर पेढांबे येथील मंदार महाविद्यालयाच्या वसतिगृहातील संस्थात्मक विलगीकरणात केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल येथील महसूल प्रशासनाचे विशेष कौतुक केले जात आहे. तालुक्यातील तिवडी-मोरेवाडी येथील निवृत्त पोस्ट मास्तर आत्माराम मोरे यांनी एका पत्राव्दारे तहसीलदार जयराज सूर्यवंशी व सहकाऱयांचे आभार मानले आहेत.