प्रतिनिधी/ चिपळूण
जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांच्या धनपद्धतीच्या वृक्ष लागवडीचे मियावाकी तंत्रावर चिपळुणात कृत्रिम जंगल प्रकल्प उभा राहत आहे. ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला असून वृक्ष लागवडीतून पर्यावरण समृद्धीसाठी धामणवणे येथील डोंगरात हा जंगल प्रकल्प साकारत आहे. कोकणातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्याचा शुभारंभ 2 सप्टेंबर रोजी नाम फाऊंडेशनचे संस्थापक प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पश्चिम घाटातील वनसंपदेचा गेल्या काही वर्षात होत असलेला ऱहास ही अतिशय चिंतेची बाब आहे. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी जंगलाचे अस्तित्व महत्वाची भूमिका पार पाडत असल्याने जागतिक स्तरावरील तंत्रज्ञांनी वेळोवेळी अधोरेखित केले आहे. या भूमिकेतूनच ग्लोबल चिपळूण टुरिझमने दोन एकर क्षेत्रावर घन पद्धतीच्या वृक्ष लागवडीतून नैसर्गिक जंगले निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेली 7 वर्षे पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज, सचिव संजीव अणेराव, समीर जानवलकर, नीलेश बापट, रमण डांगे, मनोज गांधी, विलास महाडीक, व्यवस्थापक विश्वास पाटील आदींनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
मियावाकी तंत्रज्ञानाला जगभर मान्यता
जपानमधील अकिरा मियावाकी या 93 वर्षे वयाच्या वनस्पती शास्त्रज्ञाने जपानमध्ये अशा प्रकारे वृक्ष लागवड करून स्वतःचे असे एक नवीन तंत्र विकसित केले. ज्याला आता जगभर मियावाकी तंत्रज्ञान म्हणून मान्यता मिळाली आहे. जे जंगल पूर्ण पणे वाढण्यासाठी व जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी 200 वर्षाचा कालावधी लागतो तेच जंगल 20 वर्षात समृद्ध होते हे या तंत्राचे वैशिष्ट आहे. या तंत्राने आतापर्यत 40 दशलक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली असून कोकणात अशापद्धतीने विकसित केलेली ही पहिलीच लागवड ठरणार आहे.
अशाप्रकारे केली जातेय लागवड
धामणवणे येथे राम रेडीज यांच्या शेतावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या छोटय़ा पक्षी अभयारण्याच्या बाजूला हे मोठे घनदाट जंगल तयार होणार असल्यामुळे या ठिकाणी मोठे पक्षी अभयारण्य तयार होणार आहे. घनदाट पद्धतीच्या या जंगलाचा वापर हा जनप्रबोधना बरोबरच पर्यटनासाठीही करण्याचा संस्थेचा मानस आहे..या प्रकल्पावर संस्थेने अंगमेहनतीसोबत लाखो रुपये खर्च केले आहेत. धामणवणे येथे होत असलेल्या या प्रकल्याची पूर्व तयारी गेल्या एक वर्षापासून सुरु असून 2 एकर क्षेत्रावर प्रत्येकी 4 फुटावर, अडीच फूट लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे तयार करून त्यामध्ये विविधप्रकारची सेंद्रिय खते, भाताचे तूस, कोको पिट, गांडूळ खत इत्यादी वापर करून हे ख़ड्डे भरून लागवडीसाठी तयार करण्यात आले आहेत.
स्थानिक 95 प्रजातीची लागवड
या प्रकल्पामध्ये 1 वर्षे वयाच्या 95 स्थानिक वृक्ष प्रजातीची लागवड करण्यात येणार आहे. वर्षभरापासून या रोपांची जोपासना जीवापाड मेहनत घेऊन संस्थेने केली आहे. लागवड करण्यात येणाऱया मोठय़ा वृक्षांचा प्रजातीमध्ये बहावा, बकुळ, बेहडा, बिबला, हरडा, जांभूळ, आंबा, खाया, कदंब, महारुख, वड, पिंपळ, पायर, उबर, शेवर आदी स्थानिक प्रजातींचा समावेश असून मध्यम वृक्षांमध्ये आपटा, आवळा ऐन, अंजन, वेल, करंज, पळस, पांगारा, पेरू, शमी, ताम्हन, उंडी, सुरंगी आदी, तर मोठय़ा झुडूपवर्गीय झाडांमध्ये, भोकर तोरण, बोर, कडीपत्ता, मलबेरी, शिंदी, तुती रानआवळा, करवंद तसेच अनेक वेल आणि औषधी वनस्पतीचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.