प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील गोवळकोट येथे अनधिकृत उपसा करून ठेवलेली 35 ब्रास वाळू जप्त करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री केली. यामुळे बेकायदा व्यवसाय करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
पावसाळय़ापासून खाडीत वाळू उत्खनन करण्यावर बंदी आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून बेकायदा उत्खनन करून गोवळकोट, मालदोली, चिवेली, मिरजोळी आदी भागात साठा करून त्याची रात्रीच्यावेळी वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी उमेश गिज्जेवार, चिपळूण तलाठी शांताराम येडगे, गोवळकोटचे भारत जाधव, मालदोलीचे यू, आर. राजेशिर्के, मिरजोळीचे सतीश जाधव, कोतवाल शशी पवार हे दरदिवशी गस्त घालत होते.
गुरूवारी रात्री 10 वाजल्यापासून गस्त सुरू करण्यात आली. यावेळी शुक्रवारी मध्यरात्री गोवळकोट येथे वाळू आणली गेली असल्याची माहिती त्यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी तेथे धाव घेतली असता संबधित व्यावसायिक पळून गेले. त्यानंतर पंचनामा करून ही 35 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. येथून तिची चोरी होऊ नये म्हणून उक्ताड येथील शासकीय गोदाम परिसरात रात्रीच आणून ठेवण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
व्यावसायिकांची अशीही शक्कल
कोणत्याही खासगी जागेत बेकायदा वाळू साठा सापडल्यास संबंधित मालकाला लाखो रूपये दंड होतो. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी वाळूसाठा करण्यासाठी चक्क सरकारी जागेचा वापर केला. त्यामुळे ते पळून गेल्याने दंड करायचा कोणाला, असा प्रश्न अधिकाऱयांना पडला. मात्र दंडाची शिक्षा वाचवण्यासाठी व्यावसायिकांनी लढवलेली शक्कल प्रशासनाला बुचकळय़ात टाकणारी ठरली आहे.