मेलबर्न / वृत्तसंस्था
चीनने लिखित करारांचे उल्लंघन केल्यामुळे लडाखमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी केला. जेव्हा एखादा मोठा देश लिखित वचनबद्धतेला मानत नाही, तेव्हा ही बाब संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची ठरत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत-ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या 12 व्या प्रेमवर्क संवादादरम्यान त्यांनी यासंबंधी भूमिका मांडली. तसेच चीनचे परराष्ट्रमंत्री ‘क्वाड’वर टीका करत असल्याबाबत बोलताना आमची कृती आणि भूमिका स्पष्ट आहे. वारंवार टीका केल्याने कोणीही विश्वासार्ह बनणार नाहीत, असेही जयशंकर म्हणाले.
भारत-चीन सीमा वादावर परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लडाखमध्ये 2020 मध्ये लडाखच्या सीमेवर भारी सुरक्षा दल तैनात न करण्याच्या लेखी कराराचे उल्लंघन चीनकडून झाल्याचे सांगत ही परिस्थिती सध्या जैसे थे असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. भारताच्या या दाव्यानंतर ‘क्वाड’मधील देशांनी यासंबंधी सकारात्मक विचार करणार असल्याचे स्पष्ट केले. ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकमताने यासंबंधी सहमती दर्शविली आहे. ‘क्वाड’ ही जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका या चार देशांची संघटना आहे. या देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी आणि संबंध मजबूत करण्यासाठी ही संघटना काम करत आहे. त्या अनुषंगाने क्वाड देशांनी आम्ही या प्रदेशाच्या (लडाख) स्थिरतेसाठी, शांतता आणि समृद्धीसाठी सकारात्मक गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री मारिस पेने यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेनेही व्यक्त केली चिंता
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव सर्वश्रुत आहे. दोन्ही देशांमधील तणावावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. भारताला वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत अत्यंत महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे अमेरिकेने नमूद केले आहे. व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये, बायडेन प्रशासनाच्या एका वरि÷ अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर यासंबंधी माहिती दिली. भारतासमोर अत्यंत महत्त्वाची आव्हाने असल्याचा मुद्दा येथे उपस्थित झाला असून वास्तविक नियंत्रण रेषेवरील चीनच्या डावपेचांवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना परिस्थितीवर चर्चा
परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत कोरोना संसर्गाची स्थिती, उपचार, लसीकरण आदी मुद्दय़ांबाबतही चर्चा करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलियाने लसींबाबतचे आमचे अनुभव शेअर केले. कोरोनाच्या काळात झालेल्या द्विपक्षीय चर्चांमुळे अन्य देशांनाही त्याचा लाभ झाल्याचे मतप्रदर्शन यावेळी करण्यात आले. कोरोनाप्रमाणेच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यामध्ये झालेल्या प्रगतीची थोडक्मयात चर्चा झाली. तसेच सीमापार दहशतवादाबद्दल आम्ही गंभीर आहोत. हा मुद्दा बहुपक्षीय मंचावर मांडण्याचा आणि दहशतवादविरोधी सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.