पंढरपूरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांचे होताहेत हाल
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव परिसरात अनेक विठूमाऊलीचे भाविक आहेत. केवळ आषाढी कार्तिकीच नव्हे तर जेव्हां वेळ मिळेल तेव्हा येथील भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात. परंतु बेळगावच्या भाविकांना विठ्ठलाला भेटण्यासाठीची देवाची गाडी मागील दोन वर्षांपासून बंद आहे. रेल्वे बंद असल्यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खासगी वाहने करून विठू माऊलीचे दर्शन घेण्यास पोहोचावे लागत असल्याने मध्य रेल्वेने बेळगावमधून दोन्ही रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी विठ्ठलाच्या भाविकांमधून होत आहे.
कोरोनापूर्वी बेळगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी 2 पॅसेंजर रेल्वे उपलब्ध होत्या. यातील रेल्वे क्रमांक 51464 ही रेल्वे दुपारी अडीच वाजता बेळगाव रेल्वे स्थानकातून निघून रात्री 9 वा. पंढरपूरला पोहचत होती. तर दुसरी रेल्वे बळ्ळारी येथून निघून परळी येथे जाते. ही रेल्वे दुपारी 4 वा. बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचुन रात्री 11 वा. पंढरपूर येथे पोहोचत होती. यामुळे बेळगाव, हुबळी तसेच कोकणातील भाविकांना पंढरपूरला जाणे सोयीचे ठरत होते. परंतु मार्च 2020 मध्ये पहिले लॉकडाऊन झाले आणि तेव्हापासुन आजतागायत बेळगाव – पंढरपूर पॅसेंजर बंद आहे.
भाविकांचे होताहेत हाल
बेळगाव जिल्हय़ासह बाजुच्या कारवार, धारवाड, व कोकणातून भाविक सोलापूर जिल्हय़ातील पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात. सध्या रेल्वे तर बंद आहेच. परंतु बस देखील बंद असल्यामुळे भाविकांना खासगी वाहने करून पंढरपूर गाठावे लागत आहे. थेट वाहनांची व्यवस्था नसल्याने वारकऱयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बेळगावमधून मिरज व तेथून काही मोजक्मयाच दिवशी रेल्वे उपलब्ध होत आहे. भाविकांची होणारी ही गैरसोय थांबविण्यासाठी रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविक करीत आहेत.
दोन्ही पॅसेंजर मध्यरेल्वेच्या
बेळगाव -पंढरपूर व बळ्ळारी-परळी या दोन्ही पॅसेंजर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने चालविण्यात येतात. मध्यरेल्वेच्या पुणे विभागाने अद्याप मिरज येथून पॅसेंजर सुरू केलेल्या नाहीत. मिरज येथून धावणाऱया इतर पॅसेंजरही अद्याप बंद आहेत. देशातील इतर पॅसेंजर सुरू झाल्या असताना पुणे विभागाकडून चालढकल का असा प्रश्न उपस्थित केलाजात आहे. त्यामुळे पुणे विभागाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पॅसेंजर लवकर सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
यल्लाप्पा गिरमल (वारकरी-सांबरा)
बेळगाव तसेच कर्नाटकात विठ्ठलाचे लाखो भाविक आहेत. सध्या होत असलेल्या माघ वारीला 25 ते 30 हजार भाविक कोरोनापूर्वी पंढरपूरला जात होते. परंतु सध्या रेल्वे बंद असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. खासगी गाडय़ा करून पंढरपूर गाठावे लागत आहे. भाविकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन किमान एक तरी पंढरपूरसाठी पॅसेंजर सुरू करून भाविकांची सोय करावी असे यल्लाप्पा गिरमल यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.