भारतात गुंतवणूक करण्याकडे विविध कंपन्यांचा वाढता कल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज आयफोन निर्मिती कंपनी ऍपल ही चीनमधील आपले कारभार गुंडाळून भारतात येण्याच्या तयारीत आहे असे वृत्त आहे. कोरोना संकटामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था व उद्योग अडचणीचा सामना करत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, भारताची अर्थव्यवस्था सावरत असून विविध प्रकल्पांचे होणारे सादरीकरण व त्यासाठी मिळणाऱया प्रतिसादामुळे जगातील विविध कंपन्या गुंतवणूक करुन व्यवसाय विस्तार करण्यासाठी भारताला पसंती देत असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे.
भारत आणि व्हिएतनामला चीनचा सर्वात मोठा पर्याय म्हणून महत्व दिले जात आहे. सध्या या देशांमध्ये ऍपलचे उत्पादन मर्यादित आहे. परंतु कंपनी आता भारतात उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे असेही वॉल स्ट्रीटने स्पष्ट केले.
ऍपलची भारतास पसंती
अभ्यासकांच्या माहितीनुसार बीजिंगच्या कम्युनिस्ट शासनाचा अमेरिकेसोबत संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ऍपलला चीनमध्ये सुरक्षित वाटत नसल्याने ऍपल आपला नवा पर्याय शोधत आहे. यामध्ये भारताकडेच कल राहिल्याचे उद्योग क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले आहे.